
संगमनेर, प्रतिनिधी –
टोल नाक्यावरील २२ ते २३ कामगारांना व्यवस्थापनाने अचानक कामावरून कमी केल्याने निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर आमदार अमोल खताळ यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली असून, कामगारांच्या हक्कासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि सन्मानजनक तोडगा न निघाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करून टोल नाका कायमचा बंद पाडू, असा सज्जड इशारा दिला आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोल प्लाझावर कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता शिवसेना महायुती पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे.
गेल्या नऊ-दहा वर्षांपासून इमानदारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जे.आर.आर. रोडवेज कंपनीच्या चालक राजपाल यांनी कोणताही पूर्वविचार न करता कामावरून हटवले असून, काही जणांच्या पगारातही मोठी कपात केली आहे. या दडपशाहीविरोधात कामगारांनी पुकारलेल्या साखळी उपोषणाला आमदार अमोल खताळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला.
यावेळी कामगार वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार खताळ यांनी टोल व्यवस्थापक दिलीप शिंदे यांना घटनास्थळावरूनच धारेवर धरले आणि कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याबाबत जाब विचारला.
या प्रकरणावर मार्ग काढण्यासाठी सोमवारी, (दि. ९) रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, टोल कंपनीचे मालक आणि प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत कामगारांना पुन्हा कामावर घेण्याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास महायुतीच्या वतीने तीव्र संघर्ष करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे.
नवीन कंपनी आली म्हणून जुन्या कामगारांना देशोधडीला लावणे कायद्याला धरून नसल्याचे सांगत, आमदार खताळ यांनी याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागाच्या संचालकांना कडक सूचना दिल्या आहेत.
यावेळी आमदार खताळ यांच्यासोबत महायुतीचे पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.







