संगमनेर, प्रतिनिधी –
नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या एका सराईत टोळीला पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ (संघटित गुन्हेगारी) अन्वये वाढीव कलम दाखल करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी बनवून गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पोलिसांनी आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसातील ही दुसरी कारवाई आहे. या आधीही संगमनेर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडल्यानंतर या टोळीवर देखील बीएनएसच्या कलम १११ कारवाई केली होती.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हरिष रामसिंग सोनार (वय २३, रा. शिंदे पळसे, नाशिक) हे ३० जानेवारी २०२६ रोजी दुपारी दोन ते पाच वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरून जात होते. चंदनापुरी घाटातील हॉटेल लक्ष्मीच्या पाठीमागे आरोपींनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील मोबाईल फोन व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली होती. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सुरुवातीला कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावत चार आरोपींना निष्पन्न केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रशांत दीपक मावस (रा. खांडगाव, संगमनेर), रोहित विठ्ठल साळवे (रा. बिल्लोरी, नाशिक), अतुल संजय बटवाल (रा. ढोलेवाडी, संगमनेर) आणि सिद्धार्थ दीपक मावस (रा. खांडगाव, संगमनेर) यांचा समावेश आहे. पोलिसांनी या आरोपींकडून चोरीला गेलेली मालमत्ता देखील हस्तगत केली आहे.
अटक केलेल्या आरोपींची पार्श्वभूमी तपासली असता, त्यांच्यावर संगमनेर तालुका आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. हे आरोपी संघटित टोळी बनवून, हिंसेचा किंवा धाकधपटशाचा वापर करून बेकायदेशीर मार्गाने लाभ मिळवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आदेशानुसार या गुन्ह्यात बी.एन.एस. कलम १११ ची वाढ करण्यात आली आहे.
ही यशस्वी कामगिरी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे व त्यांच्या पथकाने केली आहे. संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
चंदनापुरी घाटातील ‘लुटारू टोळी’वर नवीन कायद्यानुसार ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई
आरोपींमध्ये प्रशांत दीपक मावस (रा. खांडगाव, संगमनेर), रोहित विठ्ठल साळवे (रा. बिल्लोरी, नाशिक), अतुल संजय बटवाल (रा. ढोलेवाडी, संगमनेर) आणि सिद्धार्थ दीपक मावस (रा. खांडगाव, संगमनेर) यांचा समावेश आहे



संगमनेर, प्रतिनिधी – 


