नाशिक:
नाशिकमध्ये बालविवाहाची एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी आडगाव पोलिसांनी पीडित मुलीच्या सासरच्या आणि माहेरच्या अशा एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे केवळ १४ ते १५ वर्षे वय असलेल्या या मुलीचा विवाह नातेवाईकांनी बळजबरीने लावून दिला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२५ मध्ये पीडित मुलीचे वडील, मामा, मामी आणि मावशी यांनी संगनमत करून तिचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणाशी लावून दिला. हा विवाह मुलीच्या इच्छेविरुद्ध आणि कायद्याचे उल्लंघन करून करण्यात आला होता.
लग्नानंतर सासरी गेल्यानंतर पीडित मुलीवर सतत अत्याचार करण्यात आले. हा छळ आणि अत्याचार असह्य झाल्यामुळे अखेर पीडित मुलीने धाडस दाखवत नाशिक गाठले आणि आडगाव पोलीस ठाण्यात आपली कैफियत मांडली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी तात्काळ कार्यवाही करत पीडितेच्या तक्रारीनुसार संशयितांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. अल्पवयीन मुलीचा अशा प्रकारे बळजबरीने विवाह लावल्याच्या या घटनेमुळे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, बालविवाहाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.







