संगमनेर:
मुंबई येथे संपन्न झालेल्या छात्र भारतीच्या ४२ व्या राज्य अधिवेशनात संगमनेरचे सुपुत्र अनिकेत घुले यांची संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल संगमनेरमधील राष्ट्रसेवा दल, छात्र भारती, जयहिंद लोक चळवळ तसेच विविध सामाजिक, राजकीय व पुरोगामी संघटनांच्या वतीने के. बी. दादा देशमुख सभागृहात अनिकेत घुले यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. तांबे यांनी राष्ट्र सेवा दल आणि छात्र भारती या संघटना पुरोगामी विचार आणि भक्कम वैचारिक अधिष्ठान असणारी नवी पिढी घडवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
राष्ट्र सेवा दलाचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी छात्र भारती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने लढा देत असल्याचा गौरव केला व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रुपवते यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. राष्ट्र सेवा दल व शिक्षक नेते हिरालाल पगडाल यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले. आम्ही नेहमीच विवेकी आणि पुरोगामी विचारांच्या पाठीशी उभे राहिलो असून, जिथे चूक असेल तिथे काँग्रेसच्या विरोधातही उभे राहण्यास मागे-पुढे पाहिले नाही, अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
आपल्या सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त राज्य अध्यक्ष अनिकेत घुले म्हणाले की, छात्र भारती ही गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी महाराष्ट्रभर लढणारी संघटना आहे. शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठी आव्हाने उभी आहेत. या परिस्थितीत छात्र भारती कोणत्याही दबावाला बळी न पडता विद्यार्थी हितासाठी जोमाने काम करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसेवा दलाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा कांदळकर, नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते, कॉम्रेड कारभारी उगले, हिरालाल पगडाल सर, सीतारामजी राऊत, छात्रभारतीचे माजी अध्यक्ष रोहित ढाले, राष्ट्रसेवा दलाचे अहिल्यानगरचे माजी अध्यक्ष समीर लामखडे, संदीप काकड, राष्ट्रसेवा दलाचे तालुकाध्यक्ष राम चन्ना, मोहम्मद कैफ, राजाभाऊ अवसक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माजी कार्याध्यक्षा रंजना गवादे, गाथा परिवाराचे अध्यक्ष उल्हास पाटील, अजय फटांगरे, चंद्रकांत घुले, रवी दिवे, अनुराधा आहेर, राहुल जऱ्हाड यांसह विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी छात्रभारतीच्या इतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.






