सातारा, प्रतिनिधी –
यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सातारा येथे ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही दिग्गजांमध्ये राज्यातील राजकारण, साहित्य, समाजकारण आणि संस्कृती अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा झाली.
बाळासाहेब थोरात यांनी डॉ. साळुंखे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेचा गौरव केला. विचारांप्रती निष्ठा जपणारे आणि समाजापर्यंत सत्य पोहोचवण्यासाठी आयुष्यभर लेखणी झिजवणारे डॉ. साळुंखे हे थोर साहित्यिक असल्याचे थोरात यावेळी म्हणाले. डॉ. साळुंखे आजही आपल्या लेखनातून समाजभान जागृत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असून, त्यांनी लिहिलेले ‘विद्रोही तुकाराम’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. रूढी-परंपरांच्या विरोधात तुकाराम महाराजांनी उठवलेला आवाज आणि संत व समाजसुधारक यांचा सुंदर मिलाप डॉ. साळुंखे यांनी आपल्या साहित्यातून मांडला असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. आ. ह. साळुंखे यांनीही बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना सांगितले की, महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात थोरात यांच्यासारखी सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वे दुर्मिळ झाली आहेत. आजच्या राजकीय परिस्थितीत समाजाला त्यांच्यासारख्या नेतृत्वाची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. साळुंखे यांनी ‘चोखिया’ आणि ‘बळीवंश’ ही आपली पुस्तके थोरात यांना भेट दिली.
या भेटीत संत चोखामेळा यांच्या जीवनकार्यावर उभयतांमध्ये सविस्तर चर्चा रंगली. चोखामेळा, त्यांच्या पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, बहीण निर्मळा आणि मेहुणे बंका या चोखामेळा परिवारातील पाचही संतांनी तत्कालीन विषम व्यवस्थेविरुद्ध दिलेला लढा आणि त्यांची अभंगरचना यावर प्रकाश टाकण्यात आला. ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हा चोखामेळांचा अभंग आणि ‘अवघा रंग एक झाला’ हा सोयराबाईंचा अजरामर अभंग यांतील अद्वैत भक्तीच्या आठवणींना यावेळी उजाळा मिळाला.
नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनात बाळासाहेब थोरात यांनी केलेले भाषण आणि साहित्य क्षेत्राला दिलेली स्वातंत्र्य व स्वाभिमानाची जाणीव आजही जनमानसात कायम असल्याचे डॉ. साळुंखे यांनी आवर्जून सांगितले. लोकनेते थोरात यांची साहित्याविषयीची ओढ आणि विचारवंतांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची त्यांची भूमिका या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.







