संगमनेर, प्रतिनिधी –
राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काही ठिकाणी एजंटांकडून पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, बांधकाम कामगारांनी कोणत्याही मध्यस्थाला पैसे न देता थेट महायुती जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. फसवणूक करणाऱ्या एजंटांना अजिबात बळी पडू नका, असे आवाहन संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी केले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून शनिवारी (१४ फेब्रुवारी) संगमनेर येथील मातोश्री लॉन्स येथे आमदार खताळ यांच्या हस्ते २ हजार बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संचाचे (भांडी) वाटप करण्यात आले.
फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा पुन्हा एकदा इशारा: काही ठिकाणी योजनेचे फॉर्म भरून देण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा प्रकार समोर येत असून कोणीही अडवणूक करत असेल किंवा पैशांची मागणी करत असेल, तर त्याची माहिती गुप्तपणे द्यावी. अशा लोकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा खताळ यांनी यावेळी दिला.
संगमनेर तालुक्यात केवळ वस्तूंचे वाटपच नाही, तर मोठ्या प्रमाणात रोख अर्थसहाय्यही मिळवून देण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ६ हजार १४४ लाभार्थींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, त्या माध्यमातून ६ कोटी ३५ लाख ४ हजार रुपयांचे अर्थसहाय्य थेट कामगारांच्या खात्यात जमा झाले आहे.
यामध्ये सर्वाधिक लाभ शैक्षणिक क्षेत्राला मिळाला असून, ५,८४१ विद्यार्थ्यांना ५ कोटी ७२ लाख २७ हजार रुपयांचे वाटप झाले आहे. तसेच आरोग्य योजनेअंतर्गत १९ लाभार्थ्यांना ६ लाख ७२ हजार रुपये, सामाजिक योजनेतील १२४ प्रकरणांमध्ये २९ लाख २५ हजार रुपये आणि इतर अर्थसहाय्य योजनेतून ६० लाभार्थ्यांना ३० लाख ३२ हजार रुपयांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असून संगमनेरात शिवसेनेचा आमदार असल्याने विकासकामांत कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे सांगत आ. खताळ यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सशक्त समाज घडवण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बांधकाम कामगारांनी एजंटांना बळी पडू नका; थेट जनसंपर्क कार्यालयाशी साधा संपर्क – आ. अमोल खताळ
संगमनेरात २ हजार कामगारांना घरगुती भांड्यांचे वाटप; ६ कोटी ३५ लाखांच्या निधीचेही वितरण





