संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर नगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे पती आमदार सत्यजित तांबे यांचा बेकायदेशीर हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची दखल घेत महायुतीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने कारवाई करण्याची आणि नगराध्यक्षांचे पद रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना निर्णय प्रक्रियेत सक्षम करण्यासाठी शासनाने ५० टक्के आरक्षण दिले असून, महिला लोकप्रतिनिधींना स्वतंत्रपणे काम करता यावे यासाठी विशेष शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे. या नियमानुसार महिला पदाधिकाऱ्यांच्या पतीला किंवा नातेवाईकांना संबंधित संस्थेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास मनाई असल्याचे म्हटले आहे. मात्र, संगमनेर नगरपालिकेत या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा दावा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
निवडणुकीपासून आमदार सत्यजित तांबे हे नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात सातत्याने हस्तक्षेप करत असून, ते प्रत्यक्ष नगरपालिकेत उपस्थित राहून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ही बाब लोकशाही मूल्यांच्या आणि प्रशासकीय नियमांच्या विरोधात असल्याचे सांगत महायुतीने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
या तक्रारीमध्ये महाराष्ट्र नगरपालिका व नगरपंचायत अधिनियम, १९६५ च्या कलम ४४ चा संदर्भ देण्यात आला आहे. या कलमानुसार, मुख्याधिकाऱ्यांना नगराध्यक्ष किंवा नगरसेवक यांची कोणतीही कृती कायद्याविरुद्ध आढळल्यास त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे अधिकार आहेत. याच अधिकाराचा वापर करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि नगराध्यक्ष पद रद्द करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या शिष्टमंडळात शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे यांच्यासह अजित जाधव, विशाल एनगंदुल, अक्षय वर्पे, सिद्धार्थ तुरकने, प्रवीण कर्पे, समर्थ कट्यारे आणि अनिकेत चांगले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जर या प्रकरणात राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास टाळाटाळ झाली, तर मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला आहे. या तक्रारीमुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रशासन आता यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





