संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर शहर आणि परिसराची तहान भागवणाऱ्या निळवंडे धरणाच्या मुख्य पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवरच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने चक्क वीज पोल उभे करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर चुकीमुळे हजारो नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, राहुल गांधी समर्थक संघ (TEAM RGSS) महाराष्ट्र आणि स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
निळवंडे धरण प्रकल्पातून संगमनेरसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ही पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र, महावितरणने कोणत्याही नियोजनाशिवाय या पाईपलाईनच्या अगदी वरून आणि बाजूने वीज पोल रोवले आहेत. यामुळे पाईपलाईनच्या संरक्षक आवरणाला आधीच मोठी इजा झाली असून, भविष्यात पाईपलाईन फुटल्यास मोठी पाणी कपात सोसावी लागण्याची भीती आहे. सर्वात भयानक बाब म्हणजे, ही पाईपलाईन लोखंडी असल्याने वीज पोलमधून विद्युत प्रवाह उतरल्यास संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ‘डेथ ट्रॅप’ बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या गंभीर विषयाची दखल घेत राहुल गांधी समर्थक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोल रोवताना पाईपलाईनचे जे नुकसान झाले आहे, त्याची दुरुस्ती करून हे सर्व वीज पोल सुरक्षित अंतरावर तातडीने हलवण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या संस्थेने दिला आहे.
महावितरण आणि पाणीपुरवठा विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा फटका सामान्य जनतेला बसत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. आता वीज वितरण कंपनी यावर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण संगमनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
हे निवेदन देतेवेळी राम अरगडे, सतीश खताळ, अमोल शेलकर, अरुण चव्हाण, प्रकाश कडलग, रवींद्र हासे, प्रवीण हासे, सचिन वाळे, शंतनू भालेकर आणि मोहसीन शेख यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
महावितरणचा अजब कारभार! संगमनेरच्या मुख्य जलवाहिनीवरच रोवले वीज पोल; ‘टीम RGSS’ आक्रमक, आंदोलनाचा इशारा
निळवंडे धरण प्रकल्पातून संगमनेरसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ही पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र, महावितरणने कोणत्याही नियोजनाशिवाय या पाईपलाईनच्या अगदी वरून आणि बाजूने वीज पोल रोवले आहेत.





