श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी –
वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अरेरावी करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीस श्रीरामपूरचे सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांनी दोन महिने सश्रम कारावासाची आणि ५००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी गणेश रूपचंद गांगुर्डे याला न्यायालयाने दोषी ठरवत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, ५ ऑक्टोबर २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे वसुली पथक श्रीरामपूर येथील वॉर्ड नं. २, सुभेदार वस्ती भागात थकीत वीज बिल वसुलीसाठी आणि कनेक्शन तोडण्यासाठी गेले होते. ग्राहक रूपचंद गांगुर्डे यांच्या घरी पथक पोहोचले असता, ग्राहक, त्यांचा मुलगा गणेश गांगुर्डे आणि पत्नी बबीता गांगुर्डे यांनी वीज बिल भरण्यास स्पष्ट नकार दिला. काय करायचे ते करा, असे म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी विद्युत सहाय्यक फारूक तडवी हे वीज कनेक्शन कट करण्यासाठी पोलवर चढत असताना आरोपी गणेश गांगुर्डे याने त्यांना लाकडी दांडक्याने मारण्याचा प्रयत्न केला.
या गंभीर प्रकारानंतर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाला माहिती दिली. त्यानंतर महावितरणचे अभियंता ज्ञानेश्वर रघुनाथ गोरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्यांनाही जुमानले नाही. आरोपीने अभियंता गोरे यांची गचांडी धरून त्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी गोरे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गु.र.नं. २८४/२०१५ नुसार भारतीय दंड विधान कलम ३५३, ५०४, ५०६ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हबीब यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता मयुरेश नवले यांचा युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी गणेश गांगुर्डे याला शिक्षा सुनावली. या कामात सरकारी अभियोक्ता प्रसन्न गटणे, पोलीस उपनिरीक्षक घाणे आणि पोलीस कॉन्स्टेबल ठोंबरे यांनी सहकार्य केले.





