संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीला सध्या घाणीच्या साम्राज्याने ग्रासले असून, नदीपात्रातील साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नावर शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका साक्षी विनोद सूर्यवंशी यांनी आक्रमक पवित्रा घेत संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना लेखी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या १५ दिवसांत नदीची स्वच्छता न झाल्यास प्रभाग क्र. १३ मधील नागरिकांसह मुख्याधिकारी कार्यालयात ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
शहरातील पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काम पूर्ण केल्यानंतर पाण्याचा निचरा करणे आवश्यक होते, मात्र तसे न झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचून त्याला दुर्गंधी सुटली आहे. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. साक्षी सूर्यवंशी यांनी निवेदनात नमूद केले की, यापूर्वीही तोंडी आणि लेखी स्वरूपात वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाचे हे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतणारे आहे.
यावेळी बोलताना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, जर तांत्रिक अडचणींमुळे हे काम रखडले असेल, तर नगरपालिकेने आगामी सर्वसाधारण सभेत हा विषय तातडीने विषयपटलावर घ्यावा. परंतु, कोणत्याही परिस्थितीत म्हाळुंगी नदी स्वच्छ करून साचलेल्या गटारीच्या पाण्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आरोग्य व स्वच्छता विभागाला तात्काळ सूचना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. १५ दिवसांच्या अल्टिमेटममुळे आता नगरपरिषद प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.📌
ठेकेदाराने पुलाचे काम पूर्ण करून पुलाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा करणे आवश्यक होते परंतु तसे झालेले नाही. यापूर्वी देखील मी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन स्वच्छते बाबत सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते, यात नगरपालिकेला काही अडचण असल्यास त्यांनी पुढील येणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा विषय घ्यावा व म्हाळुंगी नदी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करावे.— साक्षी विनोद सूर्यवंशी, शिवसेना नगरसेविका.





