संगमनेर, प्रतिनिधी –
पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेल्या खंबीर पावलांमुळे संगमनेर नगरपरिषदेने ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात ५० हजार ते १ लाख लोकसंख्या गटातील ‘अमृत’ शहरांच्या श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शहराला हा बहुमान प्रदान करण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे, तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि नगरसेवक आरोग्य समिती सभापती किशोर टोकसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संगमनेर शहराच्या पर्यावरण पूरक वाटचालीचा पाया लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या कल्पक नेतृत्वातून रचला गेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या विविध उपक्रमांमुळेच संगमनेरला आजवर राष्ट्रीय व राज्य स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तोच वारसा पुढे नेत आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेने पंचतत्त्वांवर आधारित कामांची यशस्वी अंमलबजावणी केली.
शहरात राबवण्यात आलेली स्वच्छता मोहीम, प्रभावी घनकचरा व्यवस्थापन, जलसंवर्धनाचे प्रकल्प, मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी केलेले विशेष प्रयत्न यामुळे संगमनेरने राज्याच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा पुरस्कार म्हणजे शहराच्या सांघिक प्रयत्नांचे फळ असून, स्वच्छ आणि सुंदर संगमनेरसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी आणि नागरिकांच्या श्रमाचा हा सन्मान असल्याची भावना डॉ. मैथिलीताई तांबे यांनी यावेळी व्यक्त केली.
या ऐतिहासिक यशाबद्दल लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांच्यासह सर्व नगरसेवक आणि नागरिकांनी नगरपरिषदेचे कौतुक केले आहे.
📌 पर्यावरण संरक्षण ही केवळ स्पर्धा नसून ती आपली सामूहिक जबाबदारी आहे. आज मिळालेला हा सन्मान समस्त संगमनेरकरांचा असून, भविष्यात अधिक जोमाने काम करण्यासाठी हा पुरस्कार आम्हाला प्रेरणा देईल. – नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे.





