संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि नगरपरिषदेचा महसूल वाढवण्यासाठी मालमत्ता व पाणीपट्टी कर वेळेत भरणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर, शहरातील सर्व मालमत्ता व पाणीपट्टी कर धारकांनी आपल्याकडे असलेल्या कराचा भरणा वेळेत करून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा डॉ. सौ. मैथिली तांबे यांनी केले आहे.
विशेषतः ज्या मालमत्ता धारकांकडे अनेक वर्षांपासून कराची रक्कम थकीत आहे, त्यांच्यासाठी नगरपरिषदेने ‘अभय योजना’ जाहीर केली असून, या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या योजनेच्या सविस्तर माहितीनुसार, थकबाकीदार मालमत्ता धारकांच्या करावर दरमहा दोन टक्के या दराने शास्ती (दंड) आकारली जाते. मात्र, अभय योजनेअंतर्गत या शास्तीच्या रकमेत ५० टक्के इतकी मोठी सवलत देण्यात आली आहे. ही सवलत मिळवण्यासाठी थकबाकीदारांना आपली संपूर्ण थकबाकी एकरकमी भरणे बंधनकारक आहे. महत्त्वाचे म्हणजे ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंतच मर्यादित असल्याने, नागरिकांनी या कालावधीत आपला कर भरून दंडातील सवलतीचा फायदा घ्यावा, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.
या मोहिमेबाबत अधिक माहिती देताना मुख्याधिकारी दयानंद गोरे म्हणाले की, शासनाच्या विशेष निर्देशानुसार संगमनेर नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी आता विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
यामध्ये संबंधित मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करणे, मालमत्ता जप्त करणे, तसेच थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात आणि शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स बोर्डद्वारे प्रसिद्ध करणे यांसारख्या पर्यायांचा अवलंब केला जाणार आहे. शासनाकडून वसुलीचा वेळोवेळी आढावा घेतला जात असल्याने नगरपरिषदेने या प्रक्रियेला आता अधिक वेग दिला आहे.
वसुलीची ही प्रक्रिया पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी नगर परिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून थकबाकीदारांवर कारवाई करणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कर भरणा सुलभ व्हावा यासाठी नगरपरिषदेने एक विशेष पाऊल उचलले आहे. शनिवार, रविवार आणि इतर सर्व शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही नगरपरिषदेचे वसुली विभाग कार्यालय नियमितपणे सुरू ठेवण्यात आले आहे, जेणेकरून नोकरी किंवा व्यवसायानिमित्त व्यस्त असणाऱ्या नागरिकांनाही आपल्या कराचा भरणा करणे सोपे होईल.
शहराच्या स्वच्छतेसाठी आणि सोयी सुविधांसाठी नागरिकांनी जबाबदार नागरिक म्हणून वेळेत कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्यासह उपाध्यक्ष नूरमहम्मद शेख, मुख्याधिकारी दयानंद गोरे, कर अधिकारी श्रीमती श्वेता शिंदे आणि कर निरीक्षक बाजीराव नवले यांनी संयुक्तपणे केले आहे.
संगमनेर नगरपरिषदेची थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक भूमिका; ‘अभय योजने’चा लाभ घेण्याचे नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबेंचे आवाहन
मुख्याधिकारी दयानंद गोरे म्हणाले की, शासनाच्या विशेष निर्देशानुसार संगमनेर नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी आता विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.





