संगमनेर | अनंत पांगारकर –
संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गोवंश हत्या आणि अवैध मांस विक्रीचे प्रमाण वाढल्याने हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील सराईत कसाई आणि गो-तस्करांच्या विरोधात कठोर कायदेशीर पावले उचलून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) आणि ‘एमपीडीए’ (MPDA) अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना देण्यात आले.
अहिल्यानगर जिल्ह्याला असलेला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी गोवंश हत्या रोखणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अनेकदा कारवाया करून गोवंशाची सुटका केली असली, तरी संबंधित गुन्हेगार जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याच बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होत असल्याचे समोर आले आहे. या सराईत गुन्हेगारांचे जाळे तोडण्यासाठी केवळ साधी कारवाई पुरेशी नसून, त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचे गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
तालुक्यातील सर्व संशयित गो-तस्कर आणि कसायांची सविस्तर यादी तयार करून त्यांच्यावर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
हे निवेदन महाराष्ट्र प्रदेश गोरक्षा प्रमुख ऋषिकेश भागवत यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल संगमनेर प्रखंडाचे कुलदीप ठाकूर, सुरेश कालडा, ओमकार भालेराव, कृष्णा डंबीर, अनिकेत पवार, सागर पाटील, आकाश बनकर, चिराग साहू, साई ठाकूर, संतोष भोसले, गौरव वराडे आणि श्रीकांत मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पोलीस अधीक्षक यांनाही माहिती व उचित कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.





