संगमनेर, प्रतिनिधी –
साखर कारखानदारी हा राज्याच्या आणि केंद्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वाचा स्तंभ आहे. या माध्यमातून सरकारला दरवर्षी हजारो कोटींचा महसूल मिळतो. मात्र, बदलत्या परिस्थितीनुसार या क्षेत्राला दर दहा वर्षांनी नैसर्गिक किंवा आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा कठीण काळात सरकारने कारखानदारीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. सरकारने साखर कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे, एमएसपी (आधारभूत किंमत) ४ हजार रुपये करावी, बिगरव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि पेट्रोलला सक्षम पर्याय असलेल्या इथेनॉलला योग्य भाव द्यावा, अशा विविध प्रोत्साहनपर योजना तातडीने राबवाव्यात, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पा. घुले, दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, यावर्षी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उसाचे एकरी टनेज घटले आहे. त्यातच साखर कारखान्यांची वाढलेली संख्या आणि गाळप क्षमतेमुळे ऊस मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही थोरात कारखान्याने आपली गौरवशाली परंपरा कायम राखत अवघ्या ११० दिवसांत ११.४० टक्के रिकव्हरीसह ७ लाख ६५ हजार मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप केले आहे.
निळवंडे धरणाचे काम आणि कालवे पूर्ण झाल्यामुळे आता पाणी उपलब्ध झाले आहे, याचा आनंद मोठा आहे. मात्र, हे पाणी प्रत्येक वंचित घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, हाच आमचा मुख्य आग्रह आहे. तसेच शेतकऱ्यांनी आता केवळ ऊस लागवड न वाढवता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
कारखान्याने नेहमीच सभासद आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासोबतच कामगारांच्या हितालाही प्राधान्य दिले आहे. राज्य पातळीवरील निर्णयांची अंमलबजावणी करत कारखान्यातील कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ देण्यात आली आहे. या कारखान्यामुळे कामगारांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन देश-विदेशात प्रगती केली असून, अनेकांच्या जीवनात समृद्धी आली असल्याचे समाधान थोरात यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने अमृत सांस्कृतिक मंडळ व कारखाना यांच्यातर्फे आयोजित क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन स्पर्धांमधील विजेत्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले यांनी केले. या सोहळ्याला अमृत उद्योग समूहातील पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.🔵माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमधील सहकार क्षेत्र अत्यंत कॉर्पोरेट आणि पारदर्शक पद्धतीने चालवले जात आहे. सहकारी क्षेत्रासमोर आज अनेक अडचणी असल्या तरी यातून ग्रामीण भागामध्ये समृद्धी साधली गेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या समृद्धीसाठी सहकार टिकवणे काळाची गरज आहे.
सरकारने साखर कारखानदारीसाठी प्रोत्साहनपर योजना राबवाव्यात; माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन
राज्य पातळीवरील निर्णयांची अंमलबजावणी करत कारखान्यातील कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ देण्यात आली आहे





