संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत व्यक्तिमत्त्वांच्या स्मृती जतन करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांना स्व. राधावल्लभ कासट, स्व. कुंदनसिंग परदेशी आणि स्व. कैलास (आप्पा) केसेकर यांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भातील मागणीचे निवेदन पालिकेतील शिवसेना शिंदे गटाच्या एकमेव नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आज (बुधवारी) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना दिले आहे.
निवेदनानुसार, या तिन्ही नेत्यांनी संगमनेरच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी आणि सार्वजनिक क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी राबविलेले विविध उपक्रम आणि सामाजिक कार्याचा ठसा आजही जनमानसात उमटलेला आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श नवीन पिढीसमोर राहावा आणि त्यांच्या स्मृती चिरंतन स्मरणात राहाव्यात, या उद्देशाने शहरातील मुख्य रस्त्यांचे नामकरण त्यांच्या नावाने करणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी महायुतीच्या विविध शाखांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनावर अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, आता महायुतीच्या या मागणीवर नगरपरिषद प्रशासन काय सकारात्मक निर्णय घेणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.




