संगमनेर, प्रतिनिधी –
प्रशासकीय राजवटीच्या कालखंडानंतर नव्याने पदभार स्वीकारताच संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात अनेक दिवसांपासून रखडलेल्या सुमारे १५०० दाखल्यांचे विशेष मोहीम राबवून तातडीने वितरण करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शहरातून आणि बाहेरगावावरून येणाऱ्या अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासकीय कामकाजाला गती मिळाली आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीच्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शहरवासीयांना दर्जेदार सुविधा देण्याचे धोरण आखले आहे. प्रशासकीय काळात विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार होता. परिणामी, जन्म-मृत्यू विभागात अनेक प्रकरणे प्रलंबित राहिल्याने नागरिकांची मोठी वर्दळ होत असे. यातूनच काही वेळा नागरिक व कर्मचारी यांच्यात वादाचे प्रसंगही ओढवत होते. ही बाब गांभीर्याने घेत नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी तातडीने पुढाकार घेतला आणि शहरातील रुग्णालयांमध्ये जन्म झालेल्या व मृत पावलेल्या व्यक्तींची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली.
या मोहिमेअंतर्गत प्रलंबित असलेल्या पंधराशे नोंदी पूर्ण करून नागरिकांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. केवळ दाखले वाटप करून न थांबता, नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे व मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी यापुढील काळातही नागरिकांना जन्म-मृत्यूचे दाखले त्वरित मिळावेत, यादृष्टीने सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. प्रशासनातील रिक्त जागा आणि कामाचा ताण असूनही लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या या तत्पर निर्णयाचे शहरातून कौतुक होत आहे. या कार्याची दखल घेऊन संगमनेरच्या नागरिकांनी नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख व मुख्याधिकारी दयानंद गोरे यांचे विशेष आभार मानले आहेत.
संगमनेर नगरपालिकेतर्फे १५०० जन्म-मृत्यू दाखल्यांचे तातडीने वाटप; नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा
जन्म-मृत्यू विभागात अनेक प्रकरणे प्रलंबित राहिल्याने नागरिकांची मोठी वर्दळ होत असे. यातूनच काही वेळा नागरिक व कर्मचारी यांच्यात वादाचे प्रसंगही ओढवत होते.





