संगमनेर:
अखिल भारतीय किसान सभा आणि ‘सिटू’च्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेला ‘लॉग मार्च’ आता अत्यंत आक्रमक वळणावर पोहोचला असून, अहिल्यानगर लांब आहे, आता लोणी हेच आंदोलनाचे केंद्र असेल, अशी गर्जना डॉ. अजित नवले यांनी केली आहे. गुरुवारी हा मोर्चा संगमनेर येथून निझर्णेश्वरच्या दिशेने रवाना झाला असून, शुक्रवारी (दि. २७) मागण्या मान्य होईपर्यंत थेट पालकमंत्र्यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर (वाडा) मुक्काम ठोकण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
ज्याप्रमाणे एकेकाळी पुणतांब्यातून ऐतिहासिक शेतकरी संप सुरू झाला होता, त्याच धर्तीवर आता आहार कर्मचारी आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप लोणीतूनच सुरू केला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. रेल्वेचे प्रश्न, ग्रामपंचायत कर्मचारी, बांधकाम मजूर, आशा स्वयंसेविका आणि आदिवासींच्या प्रलंबित कामांवरून आंदोलकांनी सरकारला धारेवर धरले आहे. प्रशासनाकडून आणि मंत्रालयातून चर्चेसाठी फोन येत असले तरी, आम्ही शासनासमोरच आंदोलन करणार आणि प्रश्न सुटल्याशिवाय उठणार नाही, अशी ठाम भूमिका डॉ. नवलेंनी घेतली आहे.
कॉ. सदाशिव साबळे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी तीन वाजता हजारो आंदोलक हातात लाल झेंडे घेऊन, शिस्तबद्ध पद्धतीने लोणीच्या दिशेने झेपावले आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले होते. सभेनंतर आंदोलकांनी मंडपातच जेवण उरकून पुढचा प्रवास सुरू केला. या आंदोलनात कॉ. राजा अवसक, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, हेमलता शेळके, संगीता साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व नागरिक सहभागी झाले आहेत. कायदा, नियम काय व्हायचे ते होऊ द्या, पण आता माघार नाही, असा इशारा देत आंदोलकांनी लोणीकडे कूच केले आहे.
लाल बावट्याच्या वादळाचा मुक्काम आता पालकमंत्र्यांच्या वाड्यासमोर! संगमनेरहून वादळ लोणीच्या दिशेने, आजचा मुक्काम निझर्णेश्वर
आता लोणी हेच आंदोलनाचे केंद्र असेल, अशी गर्जना डॉ. अजित नवले यांनी केली आहे.





