संगमनेर, प्रतिनिधी –
मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या आणि गेल्या काही दिवसांपासून ‘हे करावंच लागेल’ असे भीष्म गर्जना करणाऱ्या संगमनेर २.० च्या मोहिमेला सोमवारी सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी नेहमीच सॉफ्ट टार्गेट ठरलेल्या नवीन नगर रस्त्यावर मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या पथकाने कारवाईला सुरुवात केली. या कारवाईची फलनिष्पत्ती समोर येण्यासाठी संगमनेरकरांना काही दिवसाची वाट बघावी लागणार आहे.
संगमनेर नगर परिषदेने आत्तापर्यंत केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमा अक्षरशः फार्स ठरल्या आहेत. अतिक्रमण आणि नवीन नगर रोड हे पालिकेच्या दृष्टीने एक समीकरण बनले आहे. शहरातील कोणत्याही गल्लीबोळातील अतिक्रमणांना हात न लावणाऱ्या नगर परिषदेसाठी कारवाईचा गाजावाजा करण्याकरता नेहमी नगर रोड प्राधान्य क्रमावर राहिला आहे. सोमवारी देखील संगमनेरकरांना याची प्रचिती आली.
नगरपालिकेच्या पथकाने बस स्थानकासमोरील पालिकेच्या गाळ्यांच्या पॅसेजमध्ये करण्यात आलेले अतिक्रमण काढली मात्र हा पॅसेज मोकळा करण्याचे धाडस दाखवले नाही. त्यामुळे पॅसेजमधील ओटे आणि पायऱ्या जैसे ते राहिल्या. यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी मात्र ते एकसारखे करण्याचे धाडस दाखविले होते.
कारवाई सुरू झाल्याने अनेक दुकानदारांनी आपली दुकाने न उघडल्याने त्यांचा दुकानांचा दुकानाबाहेरील मालाचा संसार रस्त्यावर थाटता आला नाही. तर आतापर्यंत सातत्याने बहुचर्चित ठरणाऱ्या राजपाल कापड दुकानाच्या अतिक्रमणाला पालिकेचा हातोडा पडतो का याची अनेकांना उत्सुकता होती मात्र पालिकेच्या कार्यक्षम अधिकाऱ्यांनी केवळ प्रवेशद्वारापुढे ओट्यासाठी केलेले सिमेंटचे पक्के काम फक्त काम तोडले. तसेच अशी कारवाई समोर मालपाणी हाऊसच्या प्रवेशद्वारावर देखील करण्यात आली. तर रस्त्यावरील फळावाल्यांच्या हातगाड्या हटविण्यात आल्या. रस्त्यावर लागण्यात आलेल्या हातगाड्या काढण्यात आल्याने ही बाजू मोकळी दिसत असली तरी त्या ठिकाणी लगेचच अस्ताव्यस्त चारचाकी वाहने देखील लागल्याचे दिसून आले.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून काही दिवसांपूर्वीच नागरिकांना बसण्यासाठी टाकण्यात आलेल्या ‘आय लव संगमनेर’च्या दोन बाकड्यांवर देखील पालिकेच्या जेसीबीचा पंजा पडला. नेहमीप्रमाणे हातगाड्यांचे अतिक्रमणे काढण्यात आल्याने हा अपवाद वगळता रस्ता मोठा झाला असला तरी प्रत्यक्ष दुसऱ्या बाजूची पक्की बांधकाम कायम असल्याने नेमकी झालेली कारवाई दुजाभावाची असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
📌
संगमनेर शहराच्या अनेक भागांमध्ये अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झाली आहे. यात केवळ किरकोळ अतिक्रमणांचाच नव्हे तर पक्क्या अतिक्रमणांचा देखील समावेश आहे. विशेषत: रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे शहराच्या अनेक भागात वाहतूक कोंडी सातत्याने जाणवते. रस्त्यावर लावण्यात आलेली अस्ताव्यस्त चारचाकी वाहने देखील या वाहतूक कोंडीत भर घालत असतात. शहराच्या विकासाच्या दृष्टीने तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या काळात संगमनेर नगर परिषदेमध्ये प्रभाग निहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. या अधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागांमध्ये फेरफटका मारून अवैध बांधकामे, वाहतुकीला अडथळा आणणारे व्यवसायिक दुकाने यावर कारवाया करणे अपेक्षित आहे, मात्र हे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने शहरात अतिक्रमणे वाढली आहे. त्यामुळे संगमनेर नगरपालिका कौन्सिलने प्रथमत: अशा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. गेल्या चार वर्षाच्या काळात प्रशासक राज अंगात भिडल्याने मुख्याधिकाऱ्यांपासून सामान्य कर्मचाऱ्यापर्यंत सर्वच अधिकारी नागरिकांना धुडकावून लावत असल्याचे दिसते. त्यामुळे आता अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाल्यास शहर सुधारणेला वेळ लागणार नाही अशा प्रतिक्रिया देखील संगमनेरकर व्यक्त करत आहे.

