नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा यासाठी नाशिक-पुणे रेल्वे कृती समिती संगमनेरच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जीएमआरटी हे रेल्वेपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट मत मांडणाऱ्या डॉ. काकोडकर यांच्या समितीकडून रेल्वेच्या बाजूने सकारात्मक अभिप्रायाची अपेक्षा करणे म्हणजे आंदोलनाच्या तोंडावर जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, असा आरोप कृती समितीने केला आहे. त्यामुळे डॉ. काकोडकर यांना या समितीतून तत्काळ हटवावे, अन्यथा जनआंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा रोखठोक इशारा देण्यात आला आहे.
जुन्नर तालुक्यातील खोडद येथील ‘जीएमआरटी’ (GMRT) प्रकल्पाच्या कारणास्तव रेल्वे प्रकल्पात अडथळे निर्माण होत असताना, यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केली आहे. मात्र, २४ डिसेंबर २०२४ च्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विकासकामांसाठी जीएमआरटी प्रकल्प इतरत्र हलवण्याची मागणी केली होती, तेव्हा डॉ. काकोडकर यांनी या प्रकल्पाची जोरदार पाठराखण केली होती.
अनेक वर्षांनंतर रेल्वेसारख्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पासाठी एवढे मोठे जनआंदोलन उभे राहिले असून, हे आंदोलन केवळ चक्काजामपुरते मर्यादित नसून अंतिम विजयापर्यंत सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. केवळ अभ्यास समिती नेमून आंदोलनाची धार कमी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असून, अभ्यास समिती ही जनतेला दाखवलेली एक प्रकारची गाजर ठरू शकते.
अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांची एकट्याची ताकद पुरेशी पडणार नसल्याने हे जनआंदोलन आता जनतेनेच हातात घेऊन पुढे नेण्याची गरज आहे. जोपर्यंत नाशिक-पुणे रेल्वेमार्ग प्रत्यक्ष मार्गी लागत नाही, तोपर्यंत हे आंदोलन ढिले पडू दिले जाणार नाही आणि ९ ऑगस्टचा चक्काजाम होणारच असा ठाम विश्वास कृती समितीने व्यक्त केला आहे.
या ऐतिहासिक जनआंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन नाशिक-पुणे रेल्वे कृती समिती संगमनेरचे समन्वयक सतीश खताळ, रवींद्र हासे, प्रवीण हासे, रामेश्वर पानसरे, प्रितम साबळे, अजय हासे, शिवाजी जगताप, विजय उदावंत, अमोल शेलकर, शिवाजी गुंजाळ, निलेश गुंजाळ, प्रकाश कडलग, समीर लामखडे, राहुल गायकर, मोहसीन शेख, अनिल गुंजाळ, संदीप काकड, डॉ. सचिन वाळे, ॲड. अनिल गोडसे, राम अरगडे, अरुण चव्हाण, ओंकार बिडवे, सत्यजित थोरात, प्रदीप हासे आणि प्रवीण काकड यांनी केले आहे.