कोपरगाव:
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना मिळणारा आश्रय पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांच्या मनातील भीती दूर करून त्यांना थेट प्रशासनाशी जोडण्याच्या उद्देशाने लवकरच एक विशेष ‘हेल्पलाईन’ क्रमांक सुरू करण्यात येईल. या हेल्पलाईनद्वारे तक्रार करणाऱ्या नागरिकाची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या ६४ निवासस्थानांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या चार अत्याधुनिक फॉरेन्सिक लॅब व्हॅनचेही लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, राज्य शासनाने पोलिसांच्या कल्याणासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना विशेष प्राधान्य दिले आहे. जिल्हा मुख्यालयात ३२२ निवासस्थानांचे काम प्रगतीपथावर असून कोपरगाव आणि पाथर्डी येथील कामे पूर्ण झाली आहेत. समृद्धी महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांमुळे वाढणारी अंमली पदार्थांची तस्करी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दलाचे मनुष्यबळ वाढवणे गरजेचे आहे, त्यासाठी ५०० अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे विस्तारले जात असून सर्व महाविद्यालयांच्या परिसरात कॅमेरे बसवण्याचे नियोजन जिल्हा नियोजन मंडळामार्फत करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींनीही लोकसहभागातून आपापल्या गावांत सीसीटीव्ही बसवून सुरक्षा वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले. गुन्ह्यांचा तपास जलद व्हावा आणि पुराव्यांशी छेडछाड होऊ नये यासाठी उपविभागीय स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या ‘फॉरेन्सिक व्हॅन’ मैलाचा दगड ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार आशुतोष काळे यांनी तालुक्यातील अवैध दारूविक्री व इतर बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलीस ठाण्याच्या सुसज्ज इमारतीमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढेल, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस कर्मचाऱ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रास्ताविक केले, तर पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अवैध धंदे मोडून काढण्यासाठी लवकरच विशेष ‘हेल्पलाईन’; तक्रारदाराची ओळख राहणार गुप्त – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे विस्तारले जात असून...





