संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर शहर आणि परिसरातील गावांतून बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेल्या ३३ KV वीज वाहिनीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या धोकादायक वीज वाहिनीच्या विरोधात ‘३३ KV बाधित शेतकरी व नागरिक कृती समिती’ आक्रमक झाली असून, उद्या शुक्रवार, ६ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संगमनेर कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात समितीने स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
संगमनेर शहर १३२ KV ते धांदरफळ दरम्यान ही वीज वाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, ही वाहिनी टाकताना अनेक गंभीर नियमबाह्य बाबी समोर आल्याचा आरोप समितीने केला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळवंडे पाईपलाईनवरच अत्यंत धोकादायक पद्धतीने वीज खांब उभे करण्यात आले असून, यामुळे भविष्यात पाईपलाईनची देखभाल किंवा दुरुस्ती करताना मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो, तसेच अपघाताची टांगती तलवार कायम राहणार आहे. राजापूर, मंगळापूर, चिखली आणि धांदरफळ या गावांच्या हद्दीतून ही वाहिनी जात असताना स्थानिक ग्रामपंचायतींची परवानगी डावलण्यात आली असून नागरिकांची घरे, गोठे, शाळा, मंदिरे आणि स्मशानभूमीच्या अत्यंत जवळून ही उच्च दाबाची वाहिनी नेण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, कोल्हार-घोटी या राज्य महामार्गाच्या लगत आधीच अस्तित्वात असलेल्या ११ KV च्या वाहिन्या, पथदिवे आणि शेती पंपांच्या तारांमध्येच हे नवीन ३३ KV चे खांब घुसवण्यात आले आहेत. यामुळे या भागातील संपूर्ण वीज वितरण व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत गुंजाळवाडी, राजापूर, चिखली आणि धांदरफळ बुद्रुक या ग्रामपंचायतींनी दिलेली नाहरकत प्रमाणपत्रे (NOC) रद्द केली आहेत. चिखली ग्रामपंचायतीने तर थेट मुख्यमंत्र्यांकडे हे काम थांबवण्याची लेखी मागणी केली आहे. संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी देखील जुलै २०२५ मध्ये महावितरणला दोन वेळा पत्र देऊन हे खांब स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु महावितरणने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
भविष्यात होणारी जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी ही ३३ KV ची वाहिनी तातडीने सुरक्षित अंतरावर हलवण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. महावितरण आणि संबंधित खाजगी कंपनीच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी उद्या सकाळी ११ वाजल्यापासून हे आंदोलन सुरू होणार आहे. जोपर्यंत या बेकायदेशीर कामाला स्थगिती मिळत नाही आणि खांब सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीने व्यक्त केला आहे. या आंदोलनाकडे आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कशा प्रकारे लक्ष देतात, याकडे लक्ष लागले आहे.
संगमनेरात ३३ KV वीज वाहिनीच्या विरोधात एल्गार; बाधित शेतकरी व नागरिक कृती समितीचे उद्यापासून साखळी उपोषण
भविष्यात होणारी जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी ही ३३ KV ची वाहिनी तातडीने सुरक्षित अंतरावर हलवण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे





