संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य आणि देखणे स्मारक उभारण्यासाठी शासनाकडून निधीची मागणी केलेली आहेच; मात्र शासन निधी देण्यास विलंब करत असेल तर केवळ त्यांच्यावर अवलंबून न राहता लोकवर्गणी, नगरपरिषद, आमदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून येत्या वर्षभरात हे स्मारक पूर्ण केले जाईल, असा निर्धार आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला आहे.
संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने स्मारकाच्या स्वरूपाबाबत आयोजित करण्यात आलेल्या नागरिक मत नोंदणी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या मोहिमेला संगमनेरकरांनी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, हजारो नागरिकांनी आपले मत नोंदवले आहे.
आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी स्मारकाच्या आतापर्यंतच्या प्रवासावर सविस्तर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, संगमनेरकरांच्या इच्छेनुसार या स्मारकासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्वप्रथम पाठपुरावा सुरू केला होता. २०१८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात नगरपरिषदेने याचा पहिला प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार असताना या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आणि २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बसस्थानकाची जागा स्मारकासाठी मंजूर करून घेण्यात आली. सध्या जे लोक स्मारकाची अचानक मागणी करत आहेत, ते या दीर्घ प्रक्रियेच्या सुरुवातीला कुठेच नव्हते, असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.
छत्रपती शिवाजी महाराज हे १८ पगड जातींचे आणि बारा बलुतेदारांचे आराध्य दैवत असून, त्यांचे हे स्मारक संगमनेरची अस्मिता ठरेल. संगमनेर सेवा समितीने पहिल्याच बैठकीत महापुरुषांची स्मारके उभारण्याचा जो ठराव घेतला, तो अत्यंत कौतुकास्पद असल्याचेही आमदार तांबे यांनी यावेळी नमूद केले.
याप्रसंगी नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी सांगितले की, संगमनेर हे एक सुसंस्कृत शहर असून शहराच्या विकासकामात नागरिकांचा थेट सहभाग असावा, या लोकशाहीवादी हेतूने ही मत नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे. स्मारकासाठी ‘अश्वारूढ स्मारक’, ‘भव्य उभे स्मारक’ आणि ‘सिंहासनाधीश्वर पूर्णाकृती स्मारक’ असे तीन पर्याय नागरिकांसमोर ठेवण्यात आले आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ६,११३ नागरिकांनी आपल्या पसंतीचा पर्याय निवडून या उपक्रमाला मोठा पाठिंबा दर्शवला आहे. जनतेच्या बहुमताचा आदर करूनच स्मारकाचे अंतिम स्वरूप निश्चित केले जाईल, असे आश्वासनही प्रशासनाकडून देण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासकीय निधीची वाट न पाहता वर्षभरात शिवस्मारक असे पूर्ण करणार; आमदार सत्यजित तांबे यांचा निर्धार
तीन दिवस चालणाऱ्या या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ६,११३ नागरिकांनी आपल्या पसंतीचा पर्याय निवडून या उपक्रमाला मोठा पाठिंबा दर्शवला आहे. जनतेच्या बहुमताचा आदर करूनच स्मारकाचे अंतिम स्वरूप निश्चित केले जाईल





