संगमनेर, प्रतिनिधी-
मार्चअखेर जवळ आल्याने संगमनेर नगरपरिषदेने मालमत्ता आणि पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी आपली यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित केली आहे. थकबाकी न भरणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून, या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांतील २२ नळ कनेक्शन खंडित करण्यात आली आहेत. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी स्वतः या मोहिमेचे नेतृत्व करत थकबाकीदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
कर वसुलीसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधिकारी श्वेता शिंदे, कर निरीक्षक बाजीराव नवले आणि वसुली विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. मोठ्या थकबाकीदारांच्या नावांची प्रसिद्धी बॅनर आणि वर्तमानपत्रांतून केली जाणार आहे.
नगरपरिषदेने यापूर्वीच थकबाकीदारांना जप्ती आणि नळ कनेक्शन कापण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, तरीही प्रतिसाद न देणाऱ्या २२ मालमत्ता धारकांवर प्रत्यक्ष कारवाई करून त्यांचे पाणी बंद करण्यात आले आहे. दुकाने व गाळे सीलबंद करणे, निवासी मालमत्ता जप्त करणे आणि जप्त केलेल्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करणे अशा कठोर कारवायांचा समावेश असणार आहे.
यापुढील काळात कोणतीही पूर्वसूचना न देता थेट जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिला आहे.
📌 शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी नागरिकांनी आपला कर वेळेत भरणे आवश्यक आहे. संभाव्य कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी तात्काळ कराचा भरणा करावा. ___ मैथिली तांबे नगराध्यक्ष व नूरमोहम्मद शेख उपनगराध्यक्ष.





