अहिल्यानगर:
जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. गॅस पुरवठ्याबाबत आढावा घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांच्यासह विविध गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी आणि वितरक उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला गॅस पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे कडक निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील गॅस गोदामांची विशेष पथकांमार्फत अचानक तपासणी करण्यात येणार असून, जर कोणी जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. गॅस वितरकांनी ग्राहकांना वेळेत सेवा द्यावी आणि वितरण प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
नागरिकांनी आपल्या गॅस कनेक्शनची ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी आणि केवळ अधिकृत पुरवठाधारकांकडूनच ऑनलाईन नोंदणी करून गॅस प्राप्त करावा, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. गॅस वितरणाबाबत काही तक्रारी किंवा अडचणी असल्यास ग्राहकांसाठी विविध कंपन्यांचे टोल-फ्री क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये भारत पेट्रोलियमसाठी १८००२२४३४४, तर इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलियमसाठी १८००-२३३३-५५५ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या १०७७ या क्रमांकावरही नागरिकांना मदत मिळवता येईल.


अहिल्यानगर:


