संगमनेर, प्रतिनिधी –
मक्याच्या उधारी पोटी दिलेला धनादेश न वटल्याच्या कारणावरून संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर दाखल करण्यात आलेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. भेंडे यांनी दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात फिर्यादी पक्षाला आपला दावा कायदेशीर रित्या सिद्ध करता आला नाही.
वावी (ता. सिन्नर) येथील महावीर ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर मिलिंद रमेश गंगवाल यांनी कोपरगाव तालुक्यातील डांगेवाडी येथील नितीन माधव कांडेकर आणि नारायण माधव कांडेकर यांच्याविरुद्ध संगमनेर न्यायालयात ७ लाख ७० हजार रुपयांच्या धनादेश अनादराबाबत ही तक्रार दाखल केली होती.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी पोल्ट्री व्यवसायासाठी घेतलेल्या मक्याच्या उधारीपोटी नोव्हेंबर २०१९ मध्ये ७ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश दिला होता. सदर धनादेश बँकेत भरल्यानंतर तो ‘अकाउंट ब्लॉक्ड’ या कारणाने परत आला होता. मात्र, प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजादरम्यान आरोपींच्या वकिलांनी फिर्यादीचा हा दावा पुराव्यानिशी खोडून काढला. आरोपींनी न्यायालयात सिद्ध केले की, त्यांनी २०१६-१७ सालापर्यंत फिर्यादीच्या दुसऱ्या एका फर्मच्या (महावीर कृषी सेवा केंद्र) खात्यात १० लाख ८४ हजार रुपयांहून अधिक रक्कम नेट बँकिंगद्वारे आधीच जमा केली होती. फिर्यादीने सादर केलेली २०१६ सालची बिले आणि धनादेशाची रक्कम यामध्येही मोठी तफावत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नोंदवले की, फिर्यादीने सादर केलेल्या बँक मेमोवर सुरुवातीला कोणत्याही अधिकृत स्वाक्षरी किंवा शिक्का नव्हता, जो नंतर प्रक्रियेदरम्यान सादर करण्यात आला. तसेच, ज्या पोल्ट्रीच्या नावे बिले फाडण्यात आली होती, त्याचे ठिकाण आणि आरोपींच्या पोल्ट्रीचे प्रत्यक्ष ठिकाण यामध्येही मोठी तफावत आढळली. विशेष म्हणजे, आरोपींचा पोल्ट्री व्यवसाय २०१७ मध्येच बंद झाला असताना २०२० मध्ये हा धनादेश नेमका कशासाठी देण्यात आला, याबाबत फिर्यादी कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. भेंडे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर फिर्यादीचा दावा संशयास्पद आणि पुराव्याविना असल्याचे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांच्या निकालांचा आधार घेत न्यायालयाने आरोपी नितीन कांडेकर व नारायण कांडेकर यांची कलम १३८ च्या गुन्ह्यातून मुक्तता केली. या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. सागर एस. दुशिंग यांनी प्रभावी कायदेशीर बाजू मांडली.





