संगमनेर | अनंत पांगारकर
शहराला शिस्त लावण्याच्या नावाखाली संगमनेर नगरपरिषदेने राबवलेली अतिक्रमण हटाव मोहीम आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नवीन नगर रस्त्यावरील ज्या जागांवरून गरिबांच्या हातगाड्या आणि छोटी दुकाने हटवण्यात आली, तिथे आता चक्क आलिशान चारचाकी गाड्यांनी तळ ठोकला आहे. यामुळे ही मोहीम नेमकी शहर सुशोभीकरणासाठी होती की श्रीमंतांच्या बेकायदेशीर पार्किंगला रान मोकळे करून देण्यासाठी, त्यांचे पार्किंगचे चोचले पुरविण्यासाठी असा संतप्त सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत.
काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांच्या नेतृत्वाखाली मोठा गाजावाजा करत, फौजफाटा घेऊन शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली. वाहतुकीला अडथळा होतो, शहराचे विद्रूपीकरण होते असे कारण देत अनेक हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांचे संसार उघड्यावर पाडण्यात आले. त्यावेळी प्रशासनाच्या या ‘धडक’ कारवाईचे कौतुक झाले खरे, पण अवघ्या काही दिवसांतच या कारवाईमागचा खरा चेहरा समोर आला आहे. ज्या जागेवरून गरिबांना हुसकावून लावले, तिथे आता शिस्त लागण्याऐवजी बेदरकार पार्किंगचे साम्राज्य पसरले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वाहतुकीच्या कोंडीचे कारण देऊन गरिबांवर कारवाई झाली, त्याच रस्त्यावर आता रांगांच्या रांगा लावून उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांमुळे वाहतुकीचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे. प्रशासनाने ही जागा मोकळी केल्यानंतर तिथे शिस्त लावण्यासाठी कोणतेही ठोस नियोजन केले नाही. परिणामी, ही मोहीम म्हणजे ‘गरिबांच्या पोटावर लाथ आणि चारचाकी वाल्यांना पायघड्या’ असाच प्रकार ठरला आहे.
शहरात शिस्त लावणे म्हणजे केवळ गरिबांची बांधकामे पाडणे नव्हे, तर त्या जागेचा वापर सार्वजनिक हितासाठी कसा होईल हे पाहणे प्रशासनाचे कर्तव्य होते. मात्र, संगमनेर नगरपरिषदेने केवळ ‘इव्हेंट’ म्हणून ही मोहीम राबवली की काय, अशी शंका आता उपस्थित होत आहे. अतिक्रमण हटवणे हा कायमस्वरूपी पर्याय नसून, त्या जागेवर पुन्हा बेकायदेशीर कृत्ये होणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे होते. सध्याची परिस्थिती पाहता, नगरपरिषदेने संगमनेरला शिस्त लावली की उलट शिस्त बिघडवून धनदांडग्यांचे फावले, असा सवाल आता जनता विचारत आहे. या दुटप्पी धोरणामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र असंतोष पसरला असून, मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासन आता या बेकायदेशीर पार्किंगवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





