आश्वी | वार्ताहर
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द–हनुमानवाडी–दाढ खुर्द या सुमारे ३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आश्वी खुर्द ग्रामपंचायतीला यश आले असून, गेल्या अनेक दिवसांपासून गुदमरलेला हा रस्ता आता मोकळा झाला आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून रस्त्यावरील झाडांची छाटणी केली, खड्डे बुजवले आणि बंद असलेले पथदिवे पुन्हा सुरू केल्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला होता. झाडांच्या फांद्यांमध्ये पथदिव्यांच्या तारा अडकल्याने संपूर्ण रस्ता अंधारात असायचा. त्यातच परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. या समस्येची दखल घेत सरपंच अलकाताई गायकवाड, उपसरपंच बाबा भवर आणि ग्रामपंचायत सदस्यांनी वनविभागाची रीतसर परवानगी घेऊन तातडीने झाडांच्या फांद्या हटवल्या. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवून विद्युत व्यवस्था पूर्ववत केली.
या मार्गावरून वाल्हेकर, दातीर, भालेराव, भोसले, गायकवाड यांसह अनेक कुटुंबांची मोठी वर्दळ असते. ग्रामस्थांनी यापूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही ही व्यथा मांडली होती. त्याची दखल घेत आणि ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक करत विखे यांनी या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, या कामामुळे परिसरातील भीतीचे वातावरण दूर झाले असून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहेत.तांत्रिक अडचणींमुळे या रस्त्याचे काम प्रलंबित होते, मात्र ग्रामस्थांच्या सहकार्याने आता हा प्रश्न मार्गी लागला आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या रस्त्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या कामाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष रस्ते विकासाला सुरुवात होणार आहे. – अलकाताई गायकवाड, सरपंच.





