संगमनेर, प्रतिनिधी –
शहरातील प्रलंबित विकासकामे आणि म्हाळुंगी नदीच्या स्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दाद देत नसल्याने अखेर संगमनेर नगरपालिकेत लोकप्रतिनिधींचा संयम सुटला. बुधवारी सकाळी सत्ताधारी गटाचे नगरसेवक शैलेश कलंत्री आणि योगेश जाजू यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या दालनातच जोरदार ठिय्या आंदोलन केले. तर दुसरीकडे, विरोधी शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तातडीने कामाला सुरुवात केल्याने, ‘आंदोलनाशिवाय प्रशासन हलत नाही का?’ असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
शहरातील प्रलंबित कामे आणि म्हाळुंगी नदीच्या किनाऱ्यावर साचलेली प्रचंड अस्वच्छता यामुळे नागरिक त्रस्त आहेत. वारंवार निवेदने देऊनही मुख्याधिकारी दाद देत नसल्याचा आरोप करत नगरसेवक कलंत्री आणि जाजू आक्रमक झाले. “अधिकारी गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत, जनतेला उत्तर काय द्यायचे?” अशा शब्दांत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत दालनातून हलणार नाही, अशी भूमिका घेतल्याने पालिकेत काही काळ तणावाचे वातावरण होते.
नगरसेविका साक्षी सूर्यवंशींचा ‘अल्टिमेटम’ ठरला प्रभावी – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी १० मार्च रोजी स्मरणपत्र देत प्रशासनाला खडसावले होते की, येत्या २ दिवसांत म्हाळुंगी नदीची स्वच्छता न झाल्यास प्रभागवासीयांसह ठिय्या आंदोलन केले जाईल. या इशाऱ्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. लगेचच ११ मार्च रोजी मुख्याधिकाऱ्यांनी पत्राद्वारे कळवले की, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली असून JCB च्या सहाय्याने स्वच्छता कार्य सुरू करण्यात आले आहे. लवकरच मशीनद्वारे नदीपात्रातील गाळ काढण्याचे आश्वासनही देण्यात आले.
हा तर फक्त ‘ट्रेलर’च! – आंदोलनानंतर मुख्याधिकाऱ्यांनी चर्चेची तयारी दाखवली आणि तांत्रिक अडचणी दूर करून कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, नगरसेवक कलंत्री आणि जाजू यांनी इशारा दिला आहे की, आजचे आंदोलन हा केवळ ट्रेलर होता. जर पुन्हा प्रशासकीय दिरंगाई झाली, तर यापेक्षा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.
सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी प्रशासनाविरुद्ध दंड थोपटल्याने संगमनेर पालिकेतील अधिकाऱ्यांच्या अंगात आलेला प्रशासकीय कार्यकाळाचा आळस झटकला जातो का हे येत्या काळात दिसणार आहे. मात्र, प्रत्येक कामासाठी आंदोलनाचेच अस्त्र उपसावे लागणार का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
आमदार सत्यजित तांबेंच्या जाहीरनाम्याचे काय? – संगमनेर सेवा समितीचे प्रमुख आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेरकरांसमोर २.० जाहीरनामा ठेवला आहे. या जाहीरनाम्याच्या बळावर त्यांना पालिकेमध्ये संगमनेरकरांनी एक हाती (एका विरोधी नगरसेविकेचा अपवाद वगळता) सत्ता दिली. त्यानंतर आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे यांनी संगमनेरच्या विकासासाठी “आता हे करावेच लागेल” अशी टॅगलाईन घेत कामाला सुरुवात केली. मात्र, अद्याप याची फलनिष्पत्ती पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या असहकार्यामुळे समोर येताना दिसत नाही.
संगमनेर नगरपालिकेत ‘राडा’! प्रशासकीय राजच्या काळात निर्ढावलेल्या प्रशासनाविरुद्ध सत्ताधारी नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन; तर विरोधी नगरसेविकेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर यंत्रणा हलली
संगमनेर पालिकेतील अधिकाऱ्यांच्या अंगात आलेला प्रशासकीय कार्यकाळाचा आळस झटकला जातो का हे येत्या काळात दिसणार आहे. मात्र, प्रत्येक कामासाठी आंदोलनाचेच अस्त्र उपसावे लागणार का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.





