संगमनेर, प्रतिनिधी –
देशात सध्या निर्माण झालेली भीषण गॅस टंचाई आणि गगनाला भिडलेल्या महागाईच्या निषेधार्थ संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने आज (गुरुवारी) भव्य निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आंदोलनात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष, युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केंद्र सरकारवर कडक टीका करत तातडीने दरवाढ कमी करण्याची मागणी केली.
संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात डॉ. जयश्रीताई थोरात, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, प्रमिला अभंग, पद्माताई थोरात, राजू खरात, शिवाजी जगताप, बाबासाहेब गायकर, विलास वर्पे, भास्कर शरमाळे, योगिता सातपुते, तात्याराम कुटे, शिवाजी खुळे, प्रवीण गायकवाड, नानासाहेब शिंदे, विजय पवार, जिल्हाध्यक्ष शेखर सोसे, राज्य सरचिटणीस हरी ओम पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केंद्र सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला. त्या म्हणाल्या की, आज गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले असून सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. काँग्रेसच्या काळात केवळ ३५० रुपयांना मिळणारा गॅस आज १००० रुपयांच्या पार गेला आहे. केंद्र सरकार केवळ घोषणाबाजी करण्यात मग्न असून प्रत्यक्षात सामान्य जनता मात्र गॅससाठी रांगा लावून उभी आहे. अमेरिका आणि आखाती देशांमधील युद्धाचे कारण पुढे केले जात असले तरी, सर्वसामान्यांना त्याचा फटका का बसावा? हेच का तुमचे ‘अच्छे दिन’? असा जळजळीत सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की, हे सरकार पूर्णपणे ‘थापेबाज’ आहे. रशियासोबत करार करण्यासाठीही जर अमेरिकेची परवानगी लागत असेल, तर तुमची ५६ इंची छाती कुठे गेली? केंद्र सरकार अमेरिकेपुढे झुकले असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. जर ही दरवाढ तातडीने मागे घेतली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
सध्याच्या गॅस टंचाईमुळे केवळ घरगुती ग्राहकच नाही तर महाविद्यालयांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. गॅस उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी खानावळी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला असून, सरकार केवळ भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेत असल्याची टीका आंदोलकांनी केली.
आंदोलनाच्या शेवटी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी अरुण उंडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या आणि गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी व दरवाढीबाबतचा अहवाल तातडीने वरिष्ठ स्तरावर आणि सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी पाठवण्याचे आश्वासन दिले.
केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संगमनेरात काँग्रेसचा एल्गार; गॅस दरवाढ आणि टंचाईवरून भव्य निदर्शने
सध्याच्या गॅस टंचाईमुळे केवळ घरगुती ग्राहकच नाही तर महाविद्यालयांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. गॅस उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी खानावळी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला





