अहिल्यानगर:
न्यायालयातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रकरणे अल्पावधीत निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. विशेषतः तडजोडपात्र प्रकरणांमध्ये सकारात्मक भूमिका घेऊन सामंजस्याने तोडगा काढणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आशिष पाटील यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन आणि सेंट्रल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून उत्साहात पार पडले. यावेळी उपस्थित पक्षकार आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांना मार्गदर्शन करताना न्यायाधीश पाटील बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश-३ एम. एच. शेख, पोलीस उपअधीक्षक देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा झावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी प्रास्ताविकातून लोकअदालतीचे महत्त्व आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. या राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
जिल्हा न्यायालयातील न्यायिक अधिकारी श्रीमती जे. डी. उपरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी विविध न्यायालयांमधील न्यायिक अधिकारी, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक, वकील आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकअदालतीचा लाभ घेऊन प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने मिटवावीत; प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश आशिष पाटील यांचे आवाहन
अहिल्यानगर जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.





