राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील चौकशीच्या अहवालांनी आता राज्यातल्या जनतेची मतीच गुंग होऊ लागली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी एकीकडे अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार प्रयत्नांची पराकाष्टा करत असताना दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी मंत्री प्रफुल्ल पटेल मौन साधून तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते रोहित पवारांना खोटं पाडण्याकरता कामाला लागले आहेत.
रोहित पवार यांनी पुराव्यानिशी व्यक्त केलेल्या संशयाने अपघाताची जागा घातपाताने केव्हाच घेतली आहे. पण तो घातपात नाही, असं म्हणणारे ना स्वत:हून याचा खुलासा करत ना त्यांच्या यंत्रणेकरवी तपास करत. एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताची अशी स्थिती होणं हे अजिबात स्वीकारार्ह नाही. या घटनेची निसंशय चौकशी होण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी, आमदार, पदाधिकार्यांनी, कार्यकर्त्यांनी रेटा लावला पाहिजे. ते याचा पाठपुरावा करणार नसतील तर राज्यातल्या जनतेने उठाव केला पाहिजे. असं न झाल्यास आज अजित पवारांचा क्रमांक आहे, उद्या तो सत्तेच्या मार्गात आडकाठी ठरणार्या कोणाच्याही वाट्याला येऊ शकतो. दादांच्या जाण्याने राज्याची अपरिमित हानी झाल्याचं आपण म्हणत असू तर या घटनेची सखोल चौकशी करण्यात अडचण काय? सत्तेने आणि सत्तेचे मालक असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. दुर्देवाने तसं घडत नाहीए. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपायला आता आठवडा शिल्लक असताना याविषयी एका शब्दाची टिपण्णी सरकारकडून आलेली नाही, हे विशेष. रितीरिवाजाप्रमाणे दिवंगत सदस्यांना वाहायची श्रध्दांजली अर्पिण्याचा कार्यक्रम उरकून जणू सरकारने अजित पवारांवर उपकारच केले.
दादांच्या विमान अपघाताला आज दीड महिना उलटून गेला. अति महत्वाच्या व्यक्तीच्या चौकशीचा अहवाल तातडीने प्राप्त व्हावा, अशी अपेक्षा असताना तो महिन्यानंतर बाहेर येतो, आलेल्या अहवालातील त्रुटींचे अनेक पाढे वाचूनही त्याची दीड महिन्यानंतरही दखल घेतली जात नसेल तर सारा मामला गंभीरच म्हटला पाहिजे. यामुळे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी सहकार्य करायला हवं. यासाठी दादांच्या चाहत्यांनी संबंधितांवर दबाव निर्माण केला पाहिजे. रोहित पवार म्हणतात त्याप्रमाणे अहवालातील त्रुटी विमान अपघातातील कटकारस्थान असतील तर सारं भीषण आहे. अजित पवारांच्या विमानाला जाणीवपूर्वक अपघात घडवण्यात आल्याच्या रोहित यांनी केलेल्या आरोपाने सार्यांनाच विचार करायला लावलं आहे. हा जाणीवपूर्वक घडवून आणलेला अपघात असेल तर त्याची चौकशी ही झालीच पाहिजे. जे जे याला कारण ठरतील त्या प्रत्येकाला जबाबदार ठरवून त्यांना शिक्षा व्हायला हवी. मग ते एफआयआर घेण्यास नकार देणारे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, तिथले पोलीस उपायुक्त असोत. बारामतीचे पोलीस निरीक्षक असोत किंवा अधीक्षक असोत. अथवा विमानाचा तांत्रिक दोष दुर्लक्षित करणारे अधिकारी असोत की कारस्थान करणारे असोत. हे अधिकारी कोणाच्या दबावाखाली होते? त्यांना सूचना देणारे कोण? याचा खुलासा व्हायला हवा. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे ठावूक नसेल असं नाही.
विमानाचा ट्रान्सपाँडर बंद पडणं, व्हाईस रेकॉर्डर गायब होणं, पुढे त्यात फेरफार करणं, विमानातून इंधनाची वाहतूक करणं, अपघातासाठी सातत्याने केले जाणारे दावे फोल ठरणं यामुळे अपघाताविषयी शंका व्यक्त होणं स्वाभाविक आहे. हे जर जाणीवपूर्वक झालं नसेल तर अपघाताची सखोल चौकशी करण्यास कोणी कचरण्याचं कारण नाही. अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते त्या विमानाच्या तांत्रिक तपासणीसह ऐनवेळी तिसर्याच पायलटकडे विमानाची जबाबदारी देणं, प्रतिकूल हवामानात विमान उड्डाण करण्याचा निर्णय घेणं, विमानतळावर झाड असल्याचं निमित्त करणं, अंदाज घेऊन विमान उतरवण्याचा दुसरा प्रयत्न (गो-राऊंड) न करणं या सार्या गोष्टी सामान्यांच्या अकलनाबाहेरील आहेत. अशातच दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमान प्रवासात नियमांचं उल्लंघन करून परवानगी न घेताच आपल्या क्षेत्रातून उड्डाण केल्याच्या कारणास्तव इराणच्या लष्कराने विमान उडवण्याच्या दिलेल्या धमकीने तर सारंच उघड केलं. एआयबीच्या (एअरक्राफ्ट अॅक्सिडेन्ट ब्युरो) प्राप्त अहवालावर जाहीर पत्रकार परिषदेत गंभीर शंका व्यक्त करून रोहित पवार यांनी घातपाताच्या शक्यतेला पुष्टी देणारे असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत.
28 फेब्रुवारी या दिवशी नागरी उड्डाण मंत्रालयाला अपघाताचा अहवाल प्राप्त झाला. या अहवालात दृष्यमानता कमी असल्याचा दावा करण्यात आला. तेवढा एक मुद्दा वगळला तर सगळेच दावे फोल ठरणारे आहेत. पाच हजार तास इतक्या आयुष्यमानाचं विमान आठ हजार तास चालवण्यात आल्याबद्दल चकार शब्द नसणं यातून चौकशीचं मोजमाप काय असेल ते लक्षात येतं. बारामतीच्या विमानतळावर दादांचं विमान झाडाला धडकल्याचं अहवालात नमूद करून एआयबीने स्वत:चा पाय खोलात टाकल्याचं स्पष्ट दिसतं. वास्तवात तिथे असं झाडच नसल्याचं स्पष्ट झाल्याने चौकशीत निश्चितच गडबड दिसते आहे. एआयबीचा अहवाल येऊन 15 दिवस उलटले. मात्र रोहित यांनी अहवालावर घेतलेल्या आक्षेपाचा एकही मुद्दा त्या विभागाने खोडलेला नाही, हे विशेष. संबंधित विमानात इंधनाचे भरलेले दोन बॅरेल सापडणं ही बाब तर अत्यंत निष्काळजीपणाची होय. चौकशीची ही परिस्थिती पाहून हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी करण्यात आली. पण तीही अजून मान्य करण्यात आलेली नाही. ती मान्य करण्यात अडचण काय? हे ही सांगितलं जात नाही. सीबीआय ही केंद्राची चौकशी संस्था असल्याचं निमित्त केलं जाईल. पण याआधी खोट्यानाट्या प्रकरणांच्या चौकशांसाठी सीबीआयचा ज्या प्रकारे वापर केला तो पाहाता या चौकशीसाठी पुढाकार का घेतला जात नाही, हा रोहित पवारांचा प्रश्न सडेतोड आहे.
इतक्या प्रचंड त्रुटी असताना केंद्राचे विमान उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांनी व्हीएसआर कंपनीला क्लिनचिट कसे काय देऊ शकतात? हे केवळ धक्कादायक नाही तर तमाम महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होय. ज्या मंत्र्याच्या नेतृत्वात एव्हीआयकरवी चौकशी व्हावी, त्याच विभागाचा प्रमुख विमान कंपनीला क्लिनचिट देत असेल तर न्याय मागायचा तरी कोणाकडे? ज्या व्हीएसआर कंपनीकडून अति महत्वाच्या व्यक्तींना विमान पुरवण्याची जबाबदारी होती त्या कंपनीसोबत ह्यांचे व्यक्तीगत, कौटुंबिक आणि व्यवसायिक संबंध असतील तर हा हादशाला तेही तितकेच जबाबदार आहेत, असा अर्थ निघतो. या कंपनीकडून नायडूंच्या बँकेला ठेवी मिळतात, त्यांच्या पक्षाला निधी मिळत असेल तर असे कितीही मंत्री मृत्यूमुखी पडले तरी त्याची चौकशी होण्याचा प्रश्नच नाही. कंपनीचा मालक असलेल्या व्ही.के.सिंग याच्या मुलाच्या जयपूर येथे नोव्हेंबर 2024 मध्ये आयोजित विवाहावेळी चंद्राबाबू नायडू, त्यांचा मंत्री असलेला मुलगा राममोहन नायडू आणि आजवर अजित पवारांच्या पदराखाली सत्तेची पदं भोगलेल्या प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती सारं काही सांगून जाते.
ज्या राज्य विधिमंडळात विक्रमी काळ सदस्य असलेल्या दादांना ही सभागृह न्याय देतील असं वाटत असताना तिसर्या आठवड्यापर्यंत या प्रकरणाची साधी चर्चाही झाली नाही. ती मागणी करणारे रोहित पवार, त्यांचा पक्ष, अमोल मिटकरी वगळता एकहीजण यासाठी आग्रही नाहीत. लाज वाटते ती अजित पवारांच्या राजकारणावर स्वत:ची पोळी भाजून घेणार्या त्यांच्या पक्षातल्या आमदारांची. ज्यांनी आपल्याला न्यायाने वागवण्याचा प्रयत्न केला. त्या दादांना न्याय मिळावा, म्हणून एकही आमदार पुढाकार घेत नाही, यावरून सत्तेचं राजकारण कोणत्या थराला पोहोचलंय ते कळतं.
रविवार विशेष लेख — अजितदादांच्या अपघात चौकशीचं गौडबंगाल!
लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.






