संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या ‘रक्षक दलाने’ अवघ्या काही दिवसांतच आपली उपयोगिता सिद्ध केली आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये या दलाने तातडीने हस्तक्षेप करत एका विद्यार्थिनीची छेडछाड रोखली, तर दुसऱ्या घटनेत मंगळसूत्र चोरांना जेरबंद करून पोलिसांच्या हवाली केले.
नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या दलाच्या कामगिरीमुळे शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी संगमनेर नगरपरिषदेने हे विशेष सुरक्षा रक्षक दल कार्यान्वित केले आहे. शुक्रवारी (१३ मार्च) हे दल अकोले बायपास परिसरात अतिक्रमण विरोधी मोहिमेत व्यस्त असताना, एसटी बसस्थानक परिसरात काही तरुणांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली.
रक्षक दलाने वेळ न घालवता घटनास्थळी धाव घेतली असता, तिथे दोन तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, अधिक चौकशी केली असता हे तरुण एका विद्यार्थिनीला फोनद्वारे ब्लॅकमेल करून तिची छेड काढत असल्याचे निष्पन्न झाले. पळून गेलेल्या संशयितांचा मोबाईल रक्षक दलाने जप्त करून पोलिसांकडे सुपूर्द केला आहे, आता पुढील तपास सुरू आहे.
दुसऱ्या एका घटनेत, शनिवारी देवाचा मळा परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची माहिती मिळताच रक्षक दलाचे जवान तातडीने सक्रिय झाले. त्यांनी परिसरात शोध घेऊन चोरी करणाऱ्या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आणि तत्काळ पोलिसांच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे ८ मार्च रोजी स्थापन झालेल्या या दलाने अवघ्या तीन दिवसांत अशा धाडसी कारवाया केल्या आहेत. शाळा, महाविद्यालये आणि वर्दळीच्या ठिकाणी या दलाची सतत गस्त सुरू असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप बसत आहे. नागरिकांनीही कोणत्याही संशयास्पद घटनेची माहिती देऊन या दलाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले आहे.📌 नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना…
शहरात कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह घटना आढळल्यास, तसेच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यास नागरिकांनी तात्काळ रक्षक दलाशी संपर्क साधावा. सुरक्षा रक्षक दल संपर्क क्रमांक : ९०६७२७३२७३





