संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना मंगळवारी सकाळी घडली. शाळेतून घरी परतणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात नराधमाने ॲसिड हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात ही चिमुरडी गंभीर जखमी झाली असून, या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपीला तात्काळ पकडण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पोलीस सर्व तांत्रिक बाबींचा तपास करत असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांमुळे संगमनेरची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. तालुक्यातील घटनांकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तालुक्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस यंत्रणा नेमकी काय करते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुसंस्कृत आणि शांत शहराला अशा घटनांमुळे मोठ्या प्रमाणात गालबोट लागले असून शहराची वाटचाल गुन्हेगारीकडे होत आहे.
दुर्दैवी घटनेतील पीडित मुलगी मूळची संगमनेर तालुक्यातील रहिवासी असून, वडिलांच्या निधनानंतर ती आपल्या आईसह वडगाव पान येथे मामाकडे राहून शिक्षण घेत होती. ती गावातील एका विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत आहे. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती सायकलवरून घरी निघाली होती. लोणी-संगमनेर रस्त्यावरील महादेव मळा परिसरातील सुनसान रस्त्यावर दबा धरून बसलेल्या अज्ञात तरुणाने तिच्यावर ॲसिड फेकले. निर्जन स्थळ आणि सीसीटीव्हीचा अभाव असल्याचा फायदा घेत आरोपीने हे अमानुष कृत्य केले आणि क्षणात तिथून पळ काढला.
हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या या मुलीला तातडीने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने परिसरात शोधमोहीम राबवली, मात्र रात्रीपर्यंत आरोपीचा कोणताही सुगावा लागलेला नव्हता. दरम्यान यासंदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.
या घटनेमुळे वडगाव पान आणि परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अशा भ्याड कृत्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी चोवीस तासांच्या आत आरोपीला अटक करावी, अन्यथा वडगाव पान येथे रास्ता रोकोसह तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस निलेश थोरात पाटील यांनी दिला आहे.





