नाशिक रोड (प्रतिनिधी):
इतिहास सांगतो की ज्या-ज्या वेळी शेअर बाजार कोसळतो, त्यानंतर तो पुन्हा सावरतो आणि वाढतो. सध्या इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांच्या मनातही चिंतेचे युद्ध सुरू आहे. मात्र, अशा काळात विचलित न होता संयमाने गुंतवणूक सुरू ठेवणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर तुमची गुंतवणूक मुलांचे शिक्षण किंवा निवृत्तीनंतरचे नियोजन अशा दीर्घकालीन ध्येयासाठी असेल, तर युद्धाच्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या मनातील भीतीचे युद्ध थांबवा, असे प्रतिपादन तज्ज्ञ सुनील कडलग यांनी केले.
नाशिक रोड येथील जय भवानी ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे
हॉटेल हरियालीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ‘म्युच्युअल फंडाद्वारे पेन्शनचे नियोजन व सायबर सिक्युरिटी’ या विषयावर आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून समीर नाईक, डीएसपी म्युच्युअल फंडाचे पियूष कासट, आदित्य कडलग, पुरुषोत्तम रकीबे, सुधाकर जाचक आदि मान्यवर उपस्थित होते. नुकतेच सेवानिवृत्त झालेले पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाणके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सुनील कडलग यांनी उपस्थितांना आवाहन केले की, आपली एसआयपी कधीही थांबवू नका. बाजार खाली असताना त्याच पैशात जास्त युनिट्स मिळतात, त्यामुळे ही गुंतवणुकीची एक प्रकारची ‘सेल’ आहे असे समजावे.
भूतकाळात जेव्हा जेंव्हा युद्धजन्य किंवा आपत्कालीन परिस्थितीत बाजार कोसळला असताना ज्यांनी ज्यांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली त्यांना पुढच्या काही वर्षांमध्ये सरासरीपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे, असे इतिहास सांगतो असेही ते म्हणाले.
समीर नाईक म्हणाले, युद्धाचे सावट दाटले की बाजार डगमगतात, पण भीतीचे खरे कारण युद्ध नसून त्यातून निर्माण झालेली अनिश्चितता असते. राजकीय समीकरणे कशी बदलतील याची स्पष्टता नसल्याने गुंतवणूकदार घाईने आपली गुंतवणूक विकतात. मात्र कोरोना किंवा मागील युद्धांच्या काळातही बाजार कोसळल्यानंतर अधिक वेगाने वर आला आहे, हे विसरता कामा नये. संघर्षाच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात, त्यामुळे सोन्याचे दर वाढतात. आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश असेल तर इक्विटीमधील घसरण भरून निघू शकते. जेव्हा बाजार ‘ओव्हररिअॅक्ट’ करतो, तेव्हा सामान्य गुंतवणूकदार घाबरून दर्जेदार गुंतवणूक कमी किमतीत विकतात, नेमकी त्याच वेळी मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार खरेदी करत असतात. जोपर्यंत तुम्ही तुमची गुंतवणुक विकत नाही, तोपर्यंत तुमचा तोटा केवळ कागदावर असतो, एकदा विक्री केली की तो कायमचा होतो.
व्हॉट्सॲप कॉलवर ‘तुम्हाला अरेस्ट केले आहे’ असे सांगून कोणीही अटक करू शकत नाही. अशा वेळी घाबरून न जाता कुटुंबाला विश्वासात घ्या आणि पोलिसांशी संपर्क साधा. तसेच म्युच्युअल फंडाच्या स्वॅप प्रणालीद्वारे पेन्शनचे नियोजन कसे करावे, याची सविस्तर माहिती नाईक यांनी दिली.
जय भवानी ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम रकीबे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सध्या वाढत्या महागाईच्या तुलनेत बँकांच्या मुदत ठेवी पुरेसा परतावा देत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीची योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या सत्रात उपस्थितांनी विचारलेल्या विविध शंकांचे सुनील कडलग यांनी निरसन केले. प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये दशरथ जारस, संजय खरे, दिलीप पाटील, नानासाहेब मोराडे, मधुदादा गिते, दिलीप खेडकर, श्रीकृष्ण लोहकरे, गणपत मोजाड, दत्तात्रय गोतीसे, कल्पना रकीबे, पुष्पा चौधरी यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर जाचक यांनी केले, तर उपस्थितांचे आभार दिलीप गोविंद यांनी मानले.



पेन्शनसाठी नाशिक रोडच्या ज्येष्ठ नागरिकांनी गिरविले अर्थ साक्षरतेचे धडे; गुंतवणूकदारांनी मनात युद्ध सुरू ठेवू नये : सुनील कडलग
बाजार कोसळला असताना ज्यांनी ज्यांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली त्यांना पुढच्या काही वर्षांमध्ये सरासरीपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे, असे इतिहास सांगतो

