संगमनेर, प्रतिनिधी-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतावादी समाजाचे स्वप्न पाहिले, मात्र दुर्दैवाने त्यांचे हे क्रांतिकारी विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आपण अद्यापही पूर्णतः यशस्वी झालेलो नाही, अशी खंत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे.
महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून संगमनेर येथील प्रवरा नदीकाठच्या गंगामाई घाटावर भव्य ‘अभिवादन सभा’ झाली, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्र सेवा दल आणि छात्र भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात तालुक्यातील विविध पुरोगामी आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक लढ्याला मानवंदना दिली.
डॉ. तांबे म्हणाले, १९२७ मध्ये महाड येथे झालेला हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नव्हता, तर तो मानवी प्रतिष्ठा, आत्मसन्मान आणि सामाजिक समानतेचा हुंकार होता. शतकानुशतकांची गुलामगिरी झुगारून देण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी जे पाऊल उचलले, त्यातूनच खऱ्या अर्थाने भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला नवी दिशा मिळाली. आजच्या काळात संविधानातील मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्वांनी वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने आणि एकमताने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे मांडले.
या प्रसंगी राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय सचिव डॉ. सागर भालेराव यांनी भविष्यातील कार्याची दिशा स्पष्ट केली. चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे द्विशतक (२०० वर्षे) ही दोन्ही निमित्य साधून संपूर्ण देशभरात ‘विषमता निर्मूलन निर्धार वर्ष’ साजरे केले जाणार असल्याचे ते म्हणाले. जातीभेद आणि विषमता मुक्त भारत घडवण्यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या अभिवादन सभेला डॉ. सागर भालेराव आणि डॉ. सुधीर तांबे यांच्यासह के. जी. भालेराव, हिरालाल पगडाल, अजिजभाई ओहरा, अनिकेत घुले, ज्ञानेश्वर राक्षे, प्रविण गायकवाड, रघुनाथ भालेराव, सुनंदा मेढे, संगीता जामधडे, हीना सोनावणे, सूर्यकांत शिंदे, किशोर चव्हाण, ज्ञानेश्वर सानप, जुबेर इनामदार, राहुल जऱ्हाड, विशाल शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी सामाजिक परिवर्तनासाठी आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी आयुष्यभर कटिबद्ध राहण्याचा सामूहिक निर्धार व्यक्त केला.





