संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रंगारगल्ली परिसरातील शनिमंदिरासमोर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एसटीपी) काम गेल्या १५ दिवसांपासून अर्धवट अवस्थेत टाकून देण्यात आले आहे. ठेकेदाराने हे काम अर्धवट सोडून अन्य कामांकडे लक्ष वळवल्याने या भागातील रस्ता खोदून ठेवण्यात आला असून, त्यामुळे स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी आणि भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
रंगारगल्ली परिसरातून शनिमंदिर, स्वामी समर्थ मंदिर, साईबाबा मंदिर, संतोषी माता मंदिर आणि गंगामाई मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ असते. प्रवरा नदी तीरावर जाण्यासाठी देखील हा मुख्य मार्ग आहे. मात्र, या ठिकाणी एसटीपीच्या कामासाठी रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे खोदून ठेवले आहेत. खोदाईनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात खडी आणि चिखल साचला असून पावसामुळे किंवा सांडपाण्यामुळे या चिखलातून चालणे कठीण झाले आहे. कामाच्या ठिकाणी केवळ बॅरिकेट्स लावून रस्ता अडवण्यात आला आहे, मात्र प्रत्यक्ष काम बंद असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.
या रस्त्याचा वापर दररोज शेकडो शालेय विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिक करतात. खड्डे आणि चिखलामुळे या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून पादचाऱ्यांना इजा होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. “स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर” असा नारा देणारी नगरपरिषद आपल्याच हद्दीतील या महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
युवासेना विधानसभा प्रमुख अमोल राजेंद्र डुकरे यांनी या प्रश्नी पुढाकार घेत संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हे अर्धवट राहिलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करावे आणि रस्ता पूर्ववत करून नागरिकांची गैरसोय दूर करावी. जर हे काम लवकरात लवकर पूर्ण झाले नाही, तर भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.



संगमनेर नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे रंगारगल्लीतील ‘एसटीपी’चे काम रखडले; भाविक आणि नागरिकांना चिखल-खड्ड्यांतून करावी लागतेय कसरत
युवासेना विधानसभा प्रमुख अमोल राजेंद्र डुकरे यांनी या प्रश्नी पुढाकार घेत संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे

