संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात गुरुवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आलेल्या अवकाळी पावसाने आणि पठार भागातील काही गावांमध्ये झालेल्या जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीत जांबुत खुर्द आणि जांबुत बुद्रुक या दोन गावांना सर्वाधिक फटका बसला असून, सुमारे १२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिली आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून संगमनेर तालुक्याच्या वातावरणात सातत्याने बदल होत होते. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शहर आणि तालुक्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. कोकणगाव, साकूर, घारगाव, जांबुत यांसह अनेक गावांत पाऊस झाला, मात्र पठार भागातील काही ठराविक पट्ट्यात पावसासोबतच मोठी गारपीट झाली. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी आणि नागरिकांची मोठी धावपळ उडाली.
या गारपिटीचा सर्वाधिक तडाखा जांबुत बुद्रुक आणि जांबुत खुर्द या दोन गावांना बसला आहे. कृषी विभागाने तातडीने केलेल्या पंचनाम्यानुसार, जांबुत बुद्रुक येथील ७० शेतकऱ्यांचे सुमारे ५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर जांबुत खुर्द येथील ११० शेतकऱ्यांचे ७५ हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे. अशा प्रकारे दोन्ही गावांतील एकूण १८० शेतकऱ्यांच्या १२५ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, टोमॅटो, टरबूज, पपई आणि इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची काढणी पूर्ण केली होती, त्यांचे नुकसान टळले असले तरी नगदी पिके घेणारे शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.
शासकीय नियमानुसार, ज्या शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, त्यांनाच नुकसान भरपाई दिली जाणार आहे. कृषी विभागाने आपला सविस्तर नुकसानीचा अहवाल महसूल प्रशासनाला सादर केला असून, आता बाधितांना कधी आणि किती मदत मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुक्यात इतरत्र पाऊस झाला असला तरी गारपिटीचा प्रभाव केवळ या दोनच गावांत मर्यादित असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
📌 संगमनेर तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला असला तरी जांबुत खुर्द व जांबुत बुद्रुक या दोनच गावांमध्ये गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. एकूण १८० शेतकऱ्यांच्या १२५ हेक्टरवरील कांदा, टोमॅटो, टरबूज, पपई व भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल आम्ही महसूल प्रशासनाला सादर केला आहे. — रेजा बोडके (तालुका कृषी अधिकारी, संगमनेर)

