संगमनेर, प्रतिनिधी-
नाशिक येथे हजारो भाविकांची आर्थिक, शारीरिक आणि मानसिक लूट करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या कृत्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि त्यातील राजकीय लागेबांधे पाहता, खरात याच्यासह त्याला पाठबळ देणाऱ्या बड्या राजकीय नेत्यांची व प्रशासकीय घटकांची सखोल चौकशी करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
पीडित नागरिकांना तातडीने न्याय व आर्थिक भरपाई देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणीही पक्षाने लावून धरली आहे.
या प्रकरणावर भाष्य करताना माकपने म्हटले आहे की, कोणताही भोंदू बाबा एकट्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक करू शकत नाही. या कृत्यामागे राज्यातील सत्ताधारी, प्रभावशाली राजकीय नेते आणि प्रशासनातील काही घटकांचा वरदहस्त असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचे सत्य जनतेसमोर येण्यासाठी याची उच्चस्तरीय आणि कालबद्ध चौकशी विशेष तपास पथकाद्वारे (SIT) किंवा न्यायालयीन देखरेखीखाली करण्यात यावी. तसेच, अशोक खरात याच्याशी संबंधित असलेली सर्व बेनामी मालमत्ता सरकारने तातडीने ताब्यात घ्यावी, अशी आग्रही मागणी पक्षाने केली आहे.
या गुन्ह्यात अनेक महिलांचे शोषण झाले असल्यामुळे सरकारने आणि पोलिसांनी तपास प्रक्रियेत कोणतीही ढिलाई दाखवू नये, असे आवाहन माकपने केले आहे. तपासादरम्यान कोणताही राजकीय नेता किंवा अधिकारी दोषी आढळल्यास त्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. जर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभारेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
राज्यात सध्या अंधश्रद्धा, अज्ञान आणि धार्मिक अंधभक्तीचा गैरफायदा घेऊन जनतेची लूट करण्याचे प्रकार वाढले आहेत. हे केवळ सामाजिक संकट नसून सत्ताधारी व्यवस्थेच्या अपयशाचे लक्षण आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानिक मूल्यांची पायमल्ली करणाऱ्या या प्रवृत्तींविरुद्ध सर्व पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी शक्तींनी एकत्र येण्याचे आवाहन डॉ. अजित नवले यांनी केले आहे.



भोंदू अशोक खरात व त्याच्या राजकीय आश्रयदात्यांना कठोर शिक्षा करा; माकपची आक्रमक मागणी
राज्यात सध्या अंधश्रद्धा, अज्ञान आणि धार्मिक अंधभक्तीचा गैरफायदा घेऊन जनतेची लूट करण्याचे प्रकार वाढले आहेत. हे केवळ सामाजिक संकट नसून सत्ताधारी व्यवस्थेच्या अपयशाचे लक्षण आहे.

