संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी अत्यंत कडक कारवाई केली आहे. या टोळीने केलेल्या विविध गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेत, आता त्यांच्यावर ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ च्या नवीन कलमान्वये संघटित गुन्हेगारीचा ठपका ठेवत कलम १११ अंतर्गत वाढीव कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आरोपींच्या जामिनावर बाहेर येण्याच्या शक्यता मावळल्या असून त्यांना मोठा कायदेशीर दणका मिळाला आहे.
या संदर्भात श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे मित्र दाढ रोड, आश्वी बुद्रुक येथील पेट्रोल पंपाजवळ उभे होते. यावेळी रवींद्र उर्फ बंटी आबासाहेब उर्फ रावसाहेब मदने (वय २७), वसीम रशीद शेख (वय २२) आणि तुषार विलास सोनवणे (वय २१) या तिघांनी फिर्यादीला अडवून विनाकारण शिवीगाळ केली.
एवढेच नव्हे तर, या आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारांना काठी, लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, त्यांच्या खिशातील २५ ते ३० हजार रुपये बळजबरीने काढून घेतले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता, ते सातत्याने गंभीर गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आले. या टोळीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संघटित गुन्हेगारी करून कायद्याचे उल्लंघन केले आहे. या पार्श्वभूमीवर, आश्वी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १११ समाविष्ट करण्यासाठी संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. अपर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून या गुन्ह्यात कलम १११ अन्वये वाढीव कलमे लावण्यास मंजुरी दिली.
त्यामुळे टोळीप्रमुख रवींद्र उर्फ बंटी आबासाहेब उर्फ रावसाहेब मदने याच्यासह टोळी सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नवीन कायद्यानुसार, कलम १११ हे संघटित गुन्हेगारीसाठी लागू केले जाते, यामध्ये जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. या कारवाईमुळे आरोपींना किमान एक वर्ष तरी जामीन मिळणे कठीण झाले आहे. अन्यथा, ही कलमे नसती तर आरोपी ८ ते १० दिवसांत जामिनावर बाहेर आले असते. पोलीस प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ही यशस्वी कारवाई अहमदनगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, पोलीस हेड कॉन्स्टेबल राम लहामगे आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन सातपुते यांच्या पथकाने केली आहे.





