मुंबई | प्रवीण पुरो
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन हा घातपाताचा प्रकार असेल आणि त्यामागे कोणीही व्यक्ती कितीही शक्तीमान असेल तर आकाश पाताळ एक करून त्यांना बाहेर काढू. कोणाचीही मुलाहिजा न ठेवता त्याला शोधून काढू, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनाचं प्रकरण विधानसभेत उपस्थित केलं होतं. अजित पवार यांच्या विमानाला अपघात नव्हे तर घातपात झाला आहे, असा स्पष्ट आरोप करत रोहित पवार यांनी सरकारला घेरलं होतं. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी गेल्या दोन महिन्यापासून करीत आहोत पण सरकारकडून त्याची दखल घेतली जात नसल्याबद्दल गंभीर तक्रार रोहित पवार यांनी केली होती.
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला सविस्तर उत्तर देताना अजित पवार यांच्या जाण्याचं सर्वाधिक दुःख मला असल्याचं सांगितलं. राज्याचा गाडा चालवताना अजित पवार यांनी अत्यंत सफाईदारपणे आणि उत्तमरीत्या महाराष्ट्राला आर्थिक वळणावर आणल. मला त्यांनी या राजकारणात सर्वाधिक मदत केली, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
रोहित पवार यांनी अपघाताच्या चौकशीची केलेली मागणी रास्त आहे. त्यांच्या मागणीचं मी स्वतः आणि इतरही नेते समर्थनच करतील, असं फडणवीस म्हणाले. रोहित पवार यांचं दुःख मी समजू शकतो. पण हे दुःख इतरांना झालं नाही, असं त्यांनी समजू नये. दादांचे खूप चाहते आहेत. आमदारांशी आणि मंत्र्यांशी त्यांचे अत्यंत जवळकीचे संबंध होते. राजकारणात त्यांनी आपली तत्त्व उत्तमपणे सांभाळली. यामुळे त्यांच्याशी जवळीक असलेले राज्यात खूप लोक आहेत. त्यांनाही त्यांच्या जाण्याचं अत्यंत दुःख झालं आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
रोहित पवार यांच्या मागणी पत्रानुसार आपण स्वतंत्र पत्र गृहमंत्री अमित शहा यांना दिलं आहे. त्यात या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आपण लावून धरली आहे. या मागणीसाठी काही आमदारही आग्रही आहेत, त्यांनी माझी भेट घेऊन गृहमंत्री शहांकडे शिष्टमंडळ घेऊन जाण्याची सूचना केली. त्या सूचनेनुसार लवकरच अमित शहा यांची भेट घेतली जाईल आणि हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे देण्याची मागणी लावून धरली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
रोहित पवार यांनी कर्नाटकमध्ये नोंदवलेल्या झिरो एफआयआर विषयी स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले, अशाप्रकारे एफआयआर नोंदवण्याची पद्धत नाही. यामुळे समोरच्या राज्याचं किंवा संस्थेची मानहानी होत असते. आम्ही कोणी ठरवलं तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात महाराष्ट्रात झिरो एफआयआर नोंदवू शकतो. पण त्यातून काहीही फायदा होत नसतो. अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर प्रायमाफेसिकली अहवालानंतर एफआयआर नोंदवावाच लागतो असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.





