संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर नगरपालिकेच्या वतीने शहरात विशेषतः नवीन नगर रोड परिसरात राबविण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम अत्यंत अन्यायकारक, एकतर्फी आणि भेदभाव करणारी असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी (राजपूत) यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना लेखी निवेदन देऊन स्थानिक कष्टकरी आणि छोट्या व्यावसायिकांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला आहे.
अमर कतारी यांनी निवेदनात नमूद केले आहे की, नगरपालिकेने केवळ नवीन नगर रोड परिसरातील अतिक्रमणे हटवून गरिबांच्या पोटावर पाय दिला आहे, मात्र शहरातील इतर भागांतील अतिक्रमणे अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. ज्या मोठ्या इमारतींकडे पार्किंगची सुविधा नाही, अशा ठिकाणी धनदांडगे ग्राहक भर रस्त्यात गाड्या लावतात, मात्र केवळ ते गर्भश्रीमंत असल्याने नगरपालिका प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता मेहेरबान असल्याचे दिसून येते. याउलट नगर रोड परिसरातील स्थानिक दुकानदार, शेतकरी, भाजीपाला विक्रेते आणि चहा टपरीधारक अशा सामान्य नागरिकांवर कारवाई केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर टीका करताना कतारी म्हणाले की, एकीकडे स्थानिक मराठी माणसाचा धंदा बंद केला जात असताना, दुसरीकडे बाहेरील राज्यांतून आलेल्या पाणीपुरी, आईस्क्रीम, मोमोज आणि चायनीज विक्रेत्यांवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. दुपारी ४ नंतर हे परप्रांतीय विक्रेते रस्त्यांवर उघडपणे व्यवसाय करतात, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी व शिस्तीचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. काही ठिकाणी तर चायनीज व ऑम्लेट-पावच्या गाड्यांवर मद्यपान करण्यासाठी प्रशासनाने जणू मुकसंमतीच दिली आहे की काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या पार्श्वभूमीवर, नगरपालिकेने या अन्यायकारक कारवाईला तात्काळ स्थगिती देऊन ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तसेच संपूर्ण संगमनेर शहरात कोणतीही पक्षपाती भूमिका न घेता समान व न्याय्य पद्धतीने कारवाई करण्यात यावी आणि सर्व अतिक्रमणधारक व लघु व्यावसायिकांना नियोजित व कायमस्वरूपी व्यवसायासाठी हक्काची जागा उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास, येणाऱ्या काळात स्थानिक नागरिक आणि अन्यायग्रस्त दुकानदारांच्या कुटुंबीयांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नगरपालिकेच्या प्रांगणात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा गर्भित इशारा अमर कतारी यांनी दिला आहे.





