संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी अखेर पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षसह यांची पत्नी आणि व्यवस्थापक महिलेला अटक केली आहे. पोलीस चौकशीमध्ये याप्रकरणी काय माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे.
अटक करण्यात आलेल्यामध्ये संगमनेर तालुक्यातील झोळे येथील कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक मधुकर वाळे, संचालक असलेल्या त्यांच्या पत्नी कुसुम वाळे आणि व्यवस्थापक सविता हासे यांचा समावेश आहे.
कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीची फसवणूक करून, तारण खताऐवजी परस्पर खरेदीखत लिहून घेतल्याच्या गंभीर आरोपाखाली पतसंस्थेच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे या प्रकरणी पुढील तपास करत असून आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी संगमनेरच्या सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक बी. गव्हाणे यांनी पतसंस्थेच्या प्रकरणी अकरा संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करत संस्थापक आणि त्यांच्या संचालक असलेल्या पत्नी व व्यवस्थापकाचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर शनिवारी या तिघांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती मिळते.
न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केल्याने या आरोपींना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवारपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, तक्रारदार व्यक्तीने या पतसंस्थेकडे कर्जासाठी मागणी केली असता, त्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. मात्र, हे कर्ज देत असताना फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना कर्जासाठी तारण खत करायचे असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात आरोपींनी फिर्यादीची दिशाभूल करून त्यांच्या शेतजमिनीचे परस्पर खरेदीखत करून घेतले. एवढेच नव्हे तर, फिर्यादीच्या अनेक कोऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेऊन त्यांना मंजूर झालेल्या कर्जाची पूर्ण रक्कम देखील देण्यात आली नाही, असा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे.
आरोपींनी या स्वाक्षरी केलेल्या कोऱ्या कागदपत्रांचा गैरवापर करून उपनिबंधक कार्यालयाकडून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम १०१ अन्वये वसुलीचे आदेश मिळवले. या आदेशांच्या आधारे कर्ज जामीनदाराच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई देखील करण्यात आली. ही सर्व प्रक्रिया बनावट कागदपत्रांच्या आधारे राबवण्यात आल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.
फिर्यादी हे अनुसूचित जातीचे असल्याने त्यांनी या अन्यायाविरुद्ध तक्रार दाखल केली होती, न्यायालयाच्या आदेशावरून संगमनेर तालुका पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यात आल्याने आता या प्रकरणातील पोलीस तपासाला वेग येण्याची चिन्हे आहेत.





