संगमनेर, प्रतिनिधी-
रविवारी संगमनेर तालुक्यातील पश्चिम भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. याचबरोबर अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला याचबरोबर सरकारने तातडीने पंचनामे करून सर्व नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी अशी आग्रही मागणी केली.
निमज, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी बाळासाहेब थोरात यांनी केली. यावेळी समवेत अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, अनिल काळे, बाळासाहेब देशमाने, अरुण गुंजाळ, सागर डोंगरे, मंगेश मतकर, रमेश गुंजाळ, विजय राहणे, दत्तू कोकणे, सतीश गुंजाळ, तुकाराम गुंजाळ, गंगाधर डोंगरे, संदीप गुंजाळ यांच्यासह गावांमधील विविध कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. मात्र शेतकरी हा कायम संकटात आहे. मोठ्या अडचणीवर मात करून तो पीक पिकवतो. मात्र अस्मानी संकटामुळे अनेकदा पिके वाया जातात. आलेल्या पिकांना भाव मिळत नाही. अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर जोरदार वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. जनावरांचे गोठे पडले आहेत. या भागात डाळिंब, कांदा, मका याचबरोबर उभे असलेले सर्व पिके वाया गेले असून या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सर्व शेतकरी व बाधित नागरिकांना त्वरित भरीव मदत मिळावी.
काल अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. यानंतर लोकनेते थोरात यांनी तातडीने आपल्या यंत्रणेला संबंधित शेतकऱ्यांना मदतीच्या सूचना दिल्या, याचबरोबर फोनद्वारे अनेक शेतकऱ्यांची संपर्क साधला. बाळासाहेब देशमाने व रामहरी कातोरे यांनी तातडीने विविध भागांची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला.
यावेळी निमज येथील अरुण गुंजाळ म्हणाले की, अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या-ज्या वेळी संकट येते त्यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात हे शेतकऱ्यांच्या मदतीला आले आहेत. सरकार कोणतेही असो माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे कायम जनतेच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
यावेळी धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, निमज येथील विविध नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकरी महिलांना झालेल्या नुकसानीमुळे अश्रू आवरता आले नाही.





