जालना:
समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव वाहनाने कामगारांच्या उभ्या वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सात महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य १० ते १२ मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये निधोना येथील अलकाबाई दादाराव आदमाने, मीना परमेश्वर आदमाने, कांचनबाई प्रकाश आदमाने, लक्ष्मीबाई संतोष मदन, सुमनबाई कचरू आदमाने आणि केळीगव्हाण येथील कडुबाई रामदास मदन व ताराबाई गहेनाजी चौधरी यांचा समावेश आहे. अपघातानंतर महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेहांचा खच पडला होता, हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील कडवंचीनजीक हे सर्व मजूर समृद्धी महामार्गावर सफाईचे काम आटोपून आपल्या वाहनात बसत होते. त्याच वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
घटनेची माहिती मिळताच जखमींना उपचारासाठी तातडीने जालन्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर आणि आमदार अर्जुन खोतकर यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली.
विशेष म्हणजे समृद्धी महामार्गावरील ही एका महिन्यातील दुसरी मोठी दुर्घटना आहे. यापूर्वी ६ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरजवळील वरझडी परिसरात अशाच प्रकारे रस्ते कामावर असलेल्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडले होते. त्या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला होता. सातत्याने होणाऱ्या या अपघातांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा आणि वेगाच्या मर्यादेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मृतांच्या गावांवर सध्या शोककळा पसरली आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सात महिला कामगारांचा मृत्यू
महिन्यातील दुसरी मोठी दुर्घटना आहे. यापूर्वी ६ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरजवळील वरझडी परिसरात अशाच प्रकारे रस्ते कामावर असलेल्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडले होते. त्या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला होता.






