संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर शहरात हनुमान जयंतीचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रथ मिरवणुकीत शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत हनुमानाचा रथ ओढण्याची वर्षांनुवर्षांची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात जपली.
सकाळी आठ वाजता शहर पोलीस स्थानकापासून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी आपल्या पोलीस पथकासह मानाचा भगवा ध्वज हाती घेत जयघोषात चंद्रशेखर चौकात हनुमान रथापाशी आणला. तेथे सजवलेल्या रथावर विधीवत ध्वज फडकवण्यात आला.
आमदार अमोल खताळ तसेच पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या हस्ते पवनपुत्र हनुमानरायाची महाआरती करण्यात आली. यानंतर रथाचा दोर हातात धरत नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्यासह शेकडो महिलांनी उत्साहात रथ ओढत मिरवणुकीला सुरुवात केली.
चंद्रशेखर चौकातून निघालेली ही मिरवणूक रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक, लालबहादूर शास्त्री चौक, नगरपालिका चावडी चौक, जुना कटारिया बाजारपेठ, तेलीखुंट आणि नेहरू चौक अशा विविध मार्गांवरून मार्गस्थ होत पुन्हा मोठ्या मारुती मंदिराजवळ आली. संपूर्ण मार्गावर भाविकांकडून हनुमानाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई आणि उपाध्यक्ष कमलाकर भालेकर आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले.
मिरवणूक अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.विशेष पोलिस महानिरीक्षक श्री दत्तात्रेय कराळे साहेब नाशिक यांनी संगमनेर येथील पारंपारिक रथ उत्सवाला हजेरी लावली होती.
📌 संगमनेरची ही परंपरा केवळ एक धार्मिक विधी नसून ती स्त्रीशक्ती, धैर्य आणि एकजुटीचे प्रतीक आहे. हनुमान जयंतीनिमित्त महिलांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने रथ ओढण्याची ही परंपरा आपल्या संस्कृतीची अभिमानास्पद ओळख असून, महिलांचा हा वाढता सहभाग समाजात निश्चितच सकारात्मक परिवर्तन घडवणारा आहे. हीच एकजूट आणि श्रद्धा पुढील पिढ्यांपर्यंत अखंडपणे पोहोचत राहावी, हीच अपेक्षा. डॉ. मैथिली तांबे, नगराध्यक्ष.







