अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी
संगमनेर १३२ केव्ही सबस्टेशन ते धांदरफळ दरम्यान टाकण्यात आलेली ३३ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी अत्यंत धोकादायक आणि बेकायदेशीर असल्याची तक्रार करत, बाधित गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. ही वाहिनी तातडीने सुरक्षित ठिकाणी न हलवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा राम अरगडे, सतीश खताळ, अरुण चव्हाण आणि योगेश सातपुते यांच्यासह बाधित गावकऱ्यांनी दिला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या दीड वर्षांपासून संगमनेर शहर, गुंजाळवाडी, राजापूर, मंगळापूर, चिखली आणि धांदरफळ या गावातील नागरिक या अन्यायाविरुद्ध संघर्ष करत आहेत. महावितरणने सुरुवातीला ही वाहिनी संगमनेर ते वाडापूर सबस्टेशनला जोडली जाणार असल्याचे सांगून दिशाभूल केली, मात्र प्रत्यक्षात ती चिखलीकडून धांदरफळच्या दिशेने खाजगी जागेतून नेण्यात आली आहे. प्रशासनाने या कामात हुकूमशाही गाजवून पोलिसांच्या बळाचा वापर करत गावकऱ्यांचा विरोध मोडून काढला आहे.
या कामाबाबत अनेक गंभीर तांत्रिक आणि कायदेशीर त्रुटी समोर येत आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि एमएसआरडीसीच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांचे मोजमाप न करताच हे काम पूर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कोल्हार-घोटी या एमएसआरडीसीच्या रस्त्यालगत संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणारी निळवंडे जलवाहिनी आहे.
याच जलवाहिनीवर ३३ केव्हीचे विद्युत पोल धोकादायक पद्धतीने उभारले असून, यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत महावितरणच्या अभियंत्यांशी दोनदा पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले जात आहे.
बाधित गावातील ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव घेऊन या कामाला अधिकृतपणे विरोध दर्शविला आहे. याप्रश्नी गावकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर पाच दिवस उपोषण केले होते, तर चिखली येथे मोठे आंदोलनही उभारले होते. त्या वेळी महावितरणच्या अभियंत्यांनी १५ दिवसांची मुदत मागूनही ठोस कार्यवाही केलेली नाही.
जिल्हाधिकारी यांनी स्वतः दोनदा पत्रव्यवहार करूनही अद्याप या वाहिनीचे तांत्रिक सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आता थेट आत्मदहनाचा इशारा दिला असून, न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आता जिल्हा प्रशासन या गंभीर विषयावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






