महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारात रविवारी (दि. ५) सायंकाळच्या सुमारास बिबट्याने अत्यंत हिंसक पवित्रा घेत तिघांवर प्राणघातक हल्ले केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या एकापाठोपाठ झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये दुचाकीस्वार तरुण आणि एका डॉक्टरांना गंभीर दुखापत झाली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ७:४५ च्या सुमारास अभिषेक केशव खेमनर (वय ३४) आणि सार्थक सुनील खेमनर (वय १७) हे दोघे दुचाकीवरून लेंडी नाल्याजवळून जात असताना तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला.
या अनपेक्षित आक्रमणामुळे दोघांनीही मदतीसाठी मोठा आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकताच बापूसाहेब निर्मळ, संदीप भुसाळ, विलास निर्मळ, सोमनाथ शिंदे, सचिन शिंदे, पप्पू होडगर आणि पप्पू निर्मळ हे स्थानिक ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावून आले. नागरिकांची धावपळ आणि आरडाओरडा पाहून बिबट्याने तेथून जवळच असलेल्या शेतात पळ काढला.
या घटनेची भीषणता ओसरते न ओसरते तोच काही वेळातच उंबरी येथील रहिवासी असलेले डॉ. मारुती उंबरकर (वय ५२) हे आपल्या घरी जात असताना बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात डॉ. उंबरकर गंभीर जखमी झाले. बिबट्याने केलेल्या या दोन्ही हल्ल्यांमध्ये तिघांच्याही पायाला आणि मांडीला गंभीर जखमा झाल्या आहेत. स्थानिकांनी तत्काळ तिन्ही जखमींना निमगाव जाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे डॉ. तय्यब तांबोळी, आरोग्य सेविका वैशाली ठुबे, आरोग्य सेवक तेजस भांड आणि नरेंद्र पोटे यांनी जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार केले.
जखमींना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलवले आहे. तसेच, या प्रकरणाची दखल घेत वनविभागाचे वनपाल आर. के. पवार, वनसंरक्षक राहुल सातपुते, बाळासाहेब डेंगळे आणि अरुण साळवे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि घटनेचा पंचनामा केला.
उंबरी बाळापूर परिसरात बिबट्याचा हा वावर आणि मानवी वस्तीवर होणारे हल्ले आता चिंतेचा विषय बनले आहेत. याआधीही या परिसरात बिबट्याने अनेकदा पशुधनावर आणि माणसांवर हल्ले केले आहेत. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा आणि परिसरात पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे. या परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






