महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी संगमनेर येथील आमदार सत्यजीत तांबे यांच्या ‘प्रभा’ निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, संगमनेर नगरपालिकेद्वारे राबविण्यात येत असलेला ‘रक्षक दल’ हा उपक्रम राज्यभर राबवण्याचे संकेत मंत्री तटकरे यांनी दिले आहेत.
या भेटीच्या वेळी पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे उपस्थित होत्या. दुर्गा तांबे यांनी मंत्री आदिती तटकरे यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले.
चर्चेदरम्यान आदिती तटकरे यांनी संगमनेरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक पातळीवर राबविण्यात येत असलेल्या ‘रक्षक दल’ उपक्रमाची बारकाईने माहिती घेतली. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या घोषणेचा संदर्भ देत, संगमनेरच्या ‘रक्षक दल’ उपक्रमाचा आदर्श घेऊन अशाच प्रकारची यंत्रणा संपूर्ण राज्यात उभारण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीमुळे संगमनेरचा हा उपक्रम भविष्यात राज्यस्तरीय धोरणाचा भाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






