महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्यानंतर सासरी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून अत्याचार करण्यात आला.
याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची मुकींदपूर (नेवासा फाटा) येथील आहे. ती अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्या आई-वडिलांनी आणि एका मध्यस्थाने संगनमत करून तिचा विवाह शिंदोडी (ता. संगमनेर) येथील एका तरुणाशी लावून दिला होता. हा विवाह सन २०२४ मध्ये झाला होता.
लग्नानंतर पीडिता शिंदोडी येथे सासरी राहण्यास गेल्यानंतर १० एप्रिल २०२६ पर्यंत तिच्यावर सातत्याने अन्याय झाला. सासरी राहत असताना पतीने तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केला. तसेच शुल्लक कारणावरून तिला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली.
या छळामध्ये केवळ पतीच नाही तर सासरच्या इतर मंडळींचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या सासूने तिला वारंवार उपाशी ठेवून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. या जाचाला कंटाळून अखेर पीडितेने धाडस करत पोलीस ठाणे गाठले आणि आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेचे आई-वडील, लग्नातील मध्यस्थ, तसेच शिंदोडी येथील सासू, सासरे, दीर आणि पती अशा एकूण सात जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
सदर घटनेतील गुन्हा सुरुवातीला एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता, मात्र घटनास्थळ संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने आता या प्रकरणाचा सखोल तपास घारगाव पोलीस करत आहेत. बालविवाह आणि अत्याचार अशा दोन्ही गंभीर कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.






