महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपी पतीसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयाने उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तिघे अद्याप फरार आहेत.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी केवळ १३ वर्षे ४ महिन्यांची असताना आरोपींनी संगनमत करून तिचा विवाह लावून दिला होता. पीडितेचे वय कमी असल्याचे माहित असतानाही तिच्या संमतीविना हा विवाह पार पडला आणि त्यानंतर तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आले.
या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये अहिल्या नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक ए. आर. कौटे यांनी पथकासह कारवाई करत गोपीनाथ रावसाहेब गायकवाड, पेत्रम बाबुराव साळवे, सुरेखा संतोष शिंदे, जयश्री पेत्रम साळवे या चार आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणखी काही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी आणि फरार आरोपींची माहिती मिळवण्यासाठी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायाधीश मंदार नेरलेकर यांच्या न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत (१७ एप्रिल) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बालविवाह लावणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. पीडित मुलीची रवानगी सध्या स्नेहालय, अहिल्यानगर येथे करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.






